सर्व विभागांनी समन्वय ठेवून समारंभाचे अचूक नियोजन करावे- अपर आयुक्त तुषार ठोंबरे
marathinews24.com
पुणे – विधानभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सकाळी ९.०५ मिनिटांनी होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण समारंभाचे सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून अचूक नियोजन करावे, कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभ नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजशिष्टाचार विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अपर आयुक्त श्री. ठोंबरे पुढे म्हणाले, पोलीस विभागाने ध्वजाला मानवंदना देण्याच्या व सलामीसाठी पथकांची व्यवस्था करावी. ध्वज चढविणे व उतरवणे इत्यादीबाबत निर्देशांचे पालन करावे. उपोषण, आत्मदहन, मोर्चाचे निवेदन यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. कार्यक्रमाच्या वेळी सुरक्षा पार्किंग तसेच वाहतूक नियंत्रण व्यवस्था यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. राज्यपाल महोदय यांना कार्यक्रम स्थळी घेऊन येणे व जाण्यासाठी संपूर्ण मार्ग मोकळा व सुरक्षित ठेवून मार्गामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, राजशिष्टाचाराचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
ते म्हणाले, बांधकाम विभागाने ध्वजस्तंभ, प्रवेशद्वार रंगरंगोटी करणे, निमंत्रितांना ओळीने उभे राहण्यासाठी आखणी करणे, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रितांसाठी पावसाची संभाव्यता लक्षात घेऊन मंडप उभारणे तसेच आवश्यक खुर्च्या, मुख्य कार्यक्रमाच्या वेळी दोन छत्र्या तसेच स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ सन्माननीयांसाठी अतिरिक्त छत्र्यांची व्यवस्था करावी, ध्वनिक्षेपण यंत्रणा, तांत्रिक बाबींची व्यवस्था, परिसर सुशोभीकरण, मान्यवरांना अल्पोपहार, रस्त्यांची साफसफाई व खड्ड्यांची दुरुस्ती, संपूर्ण मार्ग स्वच्छता करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आरोग्य विभागाने कार्यक्रम स्थळी ॲम्बुलन्सची व्यवस्था ठेवावी असे श्रीमती कदम यांनी सांगितले.
बैठकीला सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
























