नाना पेठेतील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – विजेचा धक्का बसून ७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा अल्पवयीन मुलगा गंभीरित्या जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दि.२ जूनला मध्यवर्ती नाना पेठेत घडली आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
भवानी पेठेतील सोसायटीत भरदिवसा चोरी – सविस्तर बातमी
सायली गणेश डांबे (वय ७) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर शिळीमकर नावाचा मुलगा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे मुले नाना पेठेतील डोके तालीमजवळ खेळत होती. रस्त्यावर खेळत असताना अचानक शॉक लागून अपघात झाला. खेळताना सायलीचा हात चुकून महावितरणच्या विद्युत खांबाला लागल्याने तिला तीव्र विद्युत शॉक बसला. या भीषण धक्यामुळे सायलीचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी तिच्यासोबत असलेला मुलगाही शॉकमुळे जखमी झाला असून त्याचा पाय निकामी झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेमागे महावितरणच्या गैरकारभाराची व गलथान कामकाजाची जबाबदारी असल्याचे नागरिकांनी सांगितले.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दुसऱ्या कुटुंबाला कायमस्वरूपी जखम बसली आहे. या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबांना आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. स्थानिक प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन कुटुंबांना मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.