चालकाशी लग्न करून राहणाऱ्या बांगलादेशी विरोधात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बनावट कागदपत्राच्या आधारे घुसखोरीच्या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांची नजर चुकवून कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करीत वाहन चालकासोबत लग्न करून राहणाऱ्या बांग्लादेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पुण्यात आळंदीत एका चालकाशी विवाह करून भारत देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदान कार्ड, पासपोर्ट काढून देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य केले होते.
सुमी खान उर्फ सुमित रवींद्र रॉय उर्फ समीर रंजीत चव्हाण (वय ३७ ) आणि रणजीत इंद्रजीत चव्हाण (वय ३५, रा.नऱ्हे, पुणे, मूळ- मोहोळ ,जिल्हा सोलापूर ) यांच्याविरोधात सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक विशाल दयानंद बोर्डे (वय ५० )यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमी रणजीत चव्हाण हिचा पासपोर्ट जून २०२४ रोजी काढला गेला असून तिची ढाका विमानतळ येथे चौकशी दरम्यान आधारकार्ड ,पॅन कार्ड,मतदार ओळखपत्र इत्यादी खोटी कागदपत्रे मिळून आलेली आहे. तिच्याकडे अधिकृत बांगलादेशी फोटो ओळखपत्र मिळाले असून तिने खोट्या कागदपत्रांवरून पासपोर्ट प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर करावी यादृष्टीने पोलिसांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता, सुमी चव्हाण हिचा सिंहगड रोड पोलीस ठाणे २०२४ मध्ये तत्कालीन पोलीस हवालदार संतोष घाडगे यांनी फाईल रिसिव्ह करून महिलेचा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून फाईल क्लिअर करून ऑनलाईन पद्धतीने पुणे शहर यांच्याकडे पाठवली होती.
सन २०१६ मध्ये बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर येऊन पुण्यातील हडपसर भागात एका हॉटेलमध्ये कॉल गर्ल म्हणून व्यवसाय करत होती त्यानंतर तिची चालक रणजीत चव्हाणसोबत ओळख झाली. त्यानी ऑक्टोबर २०२० रोजी आळंदी पुणे येथे रजिस्टर पद्धतीने लग्न केले. तिच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड ,जन्म दाखला ,मतदान कार्ड ही कागदपत्रे तिचे पती रणजीत चव्हाण यांच्या ओळखीचे एजन्टने तिला काढून दिली आहे.
ती कागदपत्रे बनावट आहेत तसेच ती बांगलादेशी आहे ही बाब तिच्या पतीस माहिती असताना देखील त्यानी तिला पाठबळ दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.