शेतमालाच्या दराच्या संरक्षणासाठी व्यवस्थापन कक्षाची स्थापना
Marathinews24.com
पुणे – जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षा (पीआययु- कृषी)अंतर्गत ‘शेतमाल बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती आत्मा कृषी संचालक तथा पीआययु-कृषीचे प्रमुख अशोक किरनळ्ळी यांनी कळविली आहे.
राज्यातील बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर – सविस्तर बातमी
अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत नुकसान होते, पण त्यासोबतच बाजारभावांतले चढउतार देखील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण ठरतात. कधीकधी दर्जेदार माल असूनही योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातील अस्थिरता कमी करण्यासाठी स्मार्ट प्रकल्प हेजिंग डेस्कची संकल्पना राबवण्यात येत असल्याचे स्मार्टचेप्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगितले.
जोखीम निवारण कक्षाअंतर्गत हळद, कापूस आणि मका यांसारख्या महत्त्वाच्या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी)बाजारातील किंमत जोखीम कमी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, काही निवडक एफपीसींना वायदे बाजारात प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांच्या वतीने हेजिंग व्यवहार करण्यात येणार आहेत.
हेजिंगच्या अनुषंगाने डेलॉईट आणि एनसीडीईएक्स इंस्टिट्युट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च (NICR)या संस्थांच्या माध्यमातून एक सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कमॉडिटी एक्सचेंज बाजारात व्यवस्थितपणे व्यवहार करतात, त्यांना याचा फायदा मिळतो.या अभ्यासाच्या शिफारशीनुसार व राज्य सरकारच्या निर्देशांच्या अनुषंगाने स्मार्ट प्रकल्प’जोखीम व्यवस्थापन कक्षा’अंतर्गत हेजिंग डेस्कस्थापन करण्यात येत आहे. हा कक्ष शेतमालाच्या भावातील जोखमींचा अभ्यास करेल आणि त्यातील धोक्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी धोरणे तयार करेल. हा संपूर्ण उपक्रम २४ महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात स्मार्ट व एनसीडीईएक्स इंस्टिट्युट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च (NICR)यांच्यात नुकताच करार करण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. वसेकर, एनआयसीआरचे उपाध्यक्ष नीरज शुक्ला, अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, अनिल गवळी, बाजार विश्लेषक अभय गायकवाडव पीक विश्लेषक डॉ. ब्रह्मानंद देशमुख उपस्थित होते.
हेजिंग डेस्कमार्फत शेतमालाच्या भावातील जोखीम कमी करण्यासाठी धोरणे व अहवाल तयार करणे, मका, कापूस आणि हळद या पिकांच्या भावातील जोखमींचे विश्लेषण करणे. शेतमालाच्या गुणवत्ता आणि किंमत यांच्यातील विसंगती कमी करण्यासाठी एक यंत्रणा तयार करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी६० प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, एकूण ५० एफपीसींना वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांची नोंदणी करणे, सरकारी यंत्रणेच्या मदतीने कमॉडिटी फ्युचर्स मार्केटमध्ये प्रायोगिक प्रकल्प राबवणे आदी कामे नियोजित आहेत.
स्मार्ट प्रकल्पाच्या या महत्वपूर्ण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या भावातील अनिश्चिततेपासून मोठा दिलासा मिळेल. योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.