विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सोमवारी (दि.१५) बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकारातील पुढील सुनावणी आता १७ जूनला होणार आहे. विशेष सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजची सुनावणी न्यायमुर्ती जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात पार पडली. ल सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला.
विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अटक केल्यापासून २४ तासात न्यायालयात हजर करणे अपेक्षित असताना हजर केले नाही. गुन्ह्यात २२ दिवस उशिरा ताब्यात घेण्यात आले. या आधारे विष्णू चाटेला जामीन देण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, विशेष सरकारी वकील ऑड. उज्ज्वल निकम यांनी या जामीन अर्जाला तीव्र विरोध नोंदवला. मकोका लागू असल्याने तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित विचार करावा लागेल, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. गेल्या दीड वर्षांपासून विष्णू चाटेने कोणतीही तक्रार केली नव्हती, मात्र आता अचानक हा मुद्दा उपस्थित करून खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ऑड.उज्वल निकम यांनी न्यायालयाचे लक्ष वेधत सांगितले की, सव्वा वर्षांपूर्वी आरोपपत्र दाखल होऊनही या खटल्याची गती मंद आहे. त्यामुळे हा खटला त्वरित चालवला जावा, अशी विनंती न्यायालया समोर त्यांनी केली आहे.
ॲड. उज्ज्वल निकम काय म्हणाले
सुनावणी लवकर सुरू करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्याचे निकम यांनी सांगितले. लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्यात यावी, अशी मागणीही केली होती. यावर प्रतिक्रिया देताना ॲड. निकम म्हणाले की, फॉरेन्सिक तपासानंतर जे काही प्राप्त झाले तेच आरोपी पक्षाला देण्यात आले आहे. मात्र जुने मुद्दे पुढे करून हा खटला जाणीवपूर्वक लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती ॲड. निकम यांनी दिली. हा खटला पद्धतशीरपणे उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू असून, यापूर्वीही आरोपींकडून ‘D टू ऑपरेशन’ (D for Delay) चालवले जात असल्याचे आपण न्यायालयात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.
जयराम चाटेच्या जामीन अर्जावर १७ जूनला सुनावणी
ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, विष्णू चाटेच्या आजच्या अर्जावर परवा पर्यंत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तसेच परवा कोणते साक्षीदार कधी तपासायचे याचा अहवाल न्यायालयात दाखल केला जाईल आणि त्यानंतर खटल्याची सुनावणी त्वरित सुरू करण्यात येईल. दरम्यान, आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावरची पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे.या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















