खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात टोळीने केली होती रेकी
marathinews24.com
पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात टोळीने रेकी केली होती. वनराजच्या खुनातील आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह इतर आरोपींची घरे या परिसरात आहेत. त्यांच्या घरांची रेकी केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तो तपास आता पुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातकडे तपासासाठी वर्ग केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गुन्हे निखील पिंगळे यांनी दिली आहे.
दत्ता बाळू काळे (रा. डोके तालमीच्या मागे, गणेश पेठ) याला पकडले. त्याच्याकडे चौकशीत रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आंदेकर टोळीच्या रडारवर कोण होते हे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. वनराज यांचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास वनराज यांचा टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करीत कोयत्याने वार करून खून केला होता. याप्रकरणात कृष्णा आंदेकर, दत्ता बाळू काळे, यश मोहिते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात होता. दरम्यान येथील बदल्याचा प्लॅन फसल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता.
याप्रकरणात बंडू आंदेकरसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून यामध्ये पुरावे गोळा केले जात आहे. दुसरीकडे भारती विद्यापीठ पोलिसांकडे गुन्हा वर्ग करून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का ? या दृष्टीने अधिक तपास होण्यासाठी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे.
आरोपी कृष्णा आंदेकरने खोलीसाठी पाच हजार रुपये देऊन काळेला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठविले होते. 30 ऑगस्टला रात्री 10 वाजता काळेने वनराजचा खून करणार्या आरोपींची घरे पाहिली. त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सअप कॉलद्वारे दिली. त्यावेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे काळेने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असे म्हटले होते. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता कृष्णाने काळेला कॉल करून सात ते आठ जणांना ५ शस्त्र घेऊन पाठविले आहे, असे सांगितले होते.
आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीची 27 खाती गोठवली
आयुष कोमकर खून प्रकरणात आतापर्यंत पोलसांनी बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा ऐवज घरझडतीत जप्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर आणि संबधीत टोळीतील सदस्यांची बँकेची तब्बल 27 खाती गोठवली असून त्या खात्यात 50 लाख 66 हजार 999 रूपये इतकी रक्कम असल्याचे समोर आले आहे. ही रक्कम आरोपींच्या मालमत्ते व्यतिरिक्त असून मालमत्ता देखील कोट्यवधींत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान टोळीच्या सर्व सदस्यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करण्याचे काम सध्या सुरू आहे.






















