पालखी मुक्कामी चोरट्यांचा सुळसुळाट
marathinews24.com
पुणे – कपडे धुवत असलेल्या वारकर्याच्या अंगावर खाजेची पावडर टाकून त्यांना स्वतःचे कपडे काढण्यास भाग पाडून चोरट्यांनी ५ हजारांची रोकड चोरून नेली आहे. त्यासोबतच एका जेष्ठ वारकरी महिलेचा मोबाइल, ५०० रूपयांची रोकड, चाव्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. विशेषतः मध्यवर्ती नाना पेठेत ही घटना घडल्यामुळे वारकर्यांच्या सुरक्षिततेचा पोलिसांचा दावा सपशेल फोल ठरला आहे.
विवाहित महिलेचा छळ; गरम भाजीची कढई फेकून मारली – सविस्तर बातमी
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि.१०) नाना पेठेसह भवानी पेठेत होता. सकाळच्या सुमारास वारकर्यांनी अंघोळ केल्यानंतर कपडे धुण्यासाठी प्राधान्य दिले होते. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी वाशिम जिल्ह्यातून आलेल्या जेष्ठ वारकर्याला लक्ष्य केले. ते कपडे धुवत असताना अंगावर खाजेची पावडर टाकली. वारकर्याला खाज सुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांना कपडे काढायला लावले. त्यानंतर तोंडाला साबण लावून वारकरी चेहर स्वच्छ करीत होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या शर्टच्या खिशातील ५ हजारांची रोकड चोरून नेली. तसेच कर्नाटकातून आलेल्या एका ६० वर्षीय महिला वारकर्याचा मोबाइल, ५००रूपये, घराच्या चाव्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
पोलिसांचा दावा फेल, गुन्हे शाखेची पथके नावालाच
वारकर्याच्या सुरक्षिततेसह बंदोबस्तासाठी पुणे पोलिसांनी तब्बल ७ हजारांचा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच साध्या वेशातील गुन्हे शाखेची वेगळी पथके कार्यरत होती. त्यासोबतच पालखी मुक्कामी असलेल्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा वावर होता. मात्र, तरीही चोरट्यांनी वारकर्यांना लक्ष्य केले. त्यांच्याकडील खाजेच्या पावडरचा उपयोग करीत दिवसाढवळ्या वारकर्यांची लुट केली आहे. या घटनांमुळे वारकर्यांच्या सुरक्षिततेचा दावा करणारे पोलीस प्रशासन तोंडावर पडले आहे. त्यासोबतच वारकर्यासाठी तैनात केलेली गुन्हे शाखेची पथके नावालाच होती का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
























