सद्‌भावना वाढीस लागण्यासाठी संमेलने महत्त्वाची- उल्हास पवार

सद्‌भावना वाढीस लागण्यासाठी संमेलने महत्त्वाची- उल्हास पवार

२१ व्या गुंफण सदभावना साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

marathinews24.com

पुणे – भाषा ही संस्कृतीची वाहक आहे आणि या वाहनाचे कार्य गुंफण हे संमेलन करत आहे. भाषा, कविता, कथा, कादंबरी या माणसांना जोडणाऱ्या गोष्टी आहेत. सद्‌भावना वाढीस लागण्यासाठी संमेलन महत्त्वाचे काम करते. संमेलनाच्या माध्यमातून समाज जोडला जातो. पण आज संवाद तुटलेला आहे. त्यामुळे समाजाला जोडण्याचे काम संमेलन करते. आज विचारशून्य माणसे पहायला मिळतात. त्यांना शहाणपण देण्यासाठी अशी संमेलन गरजेची आहेत, अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार व ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी मांडली.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय पुजा संपन्न – सविस्तर बातमी 

गुंफण अकादमी, कराड आणि भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १५) २१ वे गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलन कोथरूडमधील जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्राच्या संकुलात आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. संमेलनाध्यक्ष गझलकार सुनंदा शेळके होत्या. तसेच स्वागताध्यक्ष भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य सचिव डॉ. जयसिंग कळके, प्रमुख पाहुणे भारतीय शिक्षण संस्थेचे प्र. अध्यक्ष उदयकुमार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय उत्तुरे, ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, गजानन चेणगे उपस्थित होते.

सुरुवातीस ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये श्री संत ज्ञानराज अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथील बालवारकरी सहभागी झाले होते. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. या वेळी स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गुंफण परिवाराशी संबंधित वसंतराव जगदाळे, लालासाहेब अवघडे, अनिल जेधे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. रंगराव पाटील यांनी शाहिरीच्या माध्यमातून शाहू महाराजांची कीर्ती सादर केली. दरम्यान, उल्हास पवार म्हणाले, भाषा ही संस्कृतीची वाहक असते आणि त्यातून समाज जोडला जातो. समाज जोडण्याचे कार्य गुंफणतर्फे होत आहे. लोकशाही तेव्हा विकसित होते, जेव्हा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असते. प्रत्येकाला आपल्या भाषेविषयी, संस्कृतीविषयी अस्मिता असते. तशीच अस्मिता बेळगाव भागात मराठीबाबत आहे. तिथे मराठीवर बंधने आहेत. तिथेही मराठीचे संमेलन होते. तिथल्या लोकांना मराठी भाषा, संस्कृतीबद्दल खूप आकर्षण आहे. संमेलनातून ती अधिक वाढते. साहित्य विवेक जागा करते. परंतु, आजचे साहित्यिक गप्प बसून आहेत. ते लिहित नाहीत. अशा वेळी न घाबरता जो लिहितो तोच खरा साहित्यिक ठरतो.

साहित्य ही संवेदनांची गुंफण-सुनंदा शेळके

संमेलनाध्यक्ष सुनंदा शेळके म्हणाल्या, संमेलनामुळे स्थानिक, ग्रामीण, महिला, युवक, बोलीभाषा अशा विषयांचा समावेश होत आहे. जो आपली भाषा समृध्द करतो. नव्या लेखकांना व्यासपीठ मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुंफणचे कार्य उल्लेखनीय आहे. गुंफण म्हणजे एकमेकांत मिसळणे. वेगवेगळे धागे स्वतंत्र असतात. पण गुंफले गेले की त्यांना आकार मिळतो, त्यांचा सुंदर गोफही तयार होतो. साहित्य ही संवेदनांची गुंफण आहे. संवेदनांची ही गुंफणच साहित्याला जीवंत ठेवते.

साहित्य संमेलन ही केवळ साहित्यिकांची सभा नसते, ती मराठीत मांडलेली समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक प्रवासाची साक्ष असते. आजवर या व्यासपीठावरून मराठी भाषा, मराठी साहित्य, समाज, संस्कृती, समाजाची मूल्ये आणि समकालीन प्रश्न निर्भीडपणे मांडले गेले आहेत. भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपली ओळख असते. भाषेतील, साहित्यातील विविधता जपणे हे आपले कार्य आहे. उदयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तर जयसिंग कळके यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. बसवेश्वर चेणगे यांनी संमेलनांची माहिती दिली. सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×