चालकाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोहेल नूर अन्सारी (वय २१, सध्या रा. जनवाडी, गोखलेनगर, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र रेहान इक्रम अन्सारी (वय १९, सध्या रा. जनवाडी, गोखलेनगर, मूळ रा. बिहार) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल आणि रेहान मूळचे बिहारचे आहेत. दोघे जण मजूरी करतात. २९ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास सायकलस्वार रेहान आणि त्याचा मित्र सोहेल हे गणेशखिंड रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने सायकलला पाठीमागून धडक दिली. मागे बसलेला सोहेल पीएमपी बसच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.
पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन शस्त्राने वार
पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुलटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी रुपेश मारुती कांबळे (वय ३८, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शाहरुख सलीम बागवान (वय ३१, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि बागवान हे ओळखीचे आहेत. त्यांच्यात वाद झाले होते. २९ ऑगस्टला सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपीने बागवान याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर बागवान गुलटेकडीतील गनीबाबा दर्गा परिसरातील टेकडीवर गेला. आरोपी तेथे आला. तू पोलिसांचा खबरी आहे, असा आरोप करुन त्याच्यावर चाकूने वार केले. चाकूने वार केल्यानंतर बागवान जखमी झाला. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक बी. पी. शिरसाठ तपास करत आहेत.






















