गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांची नजर
marathinews24.com
पुणे – ‘महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मका कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आतापर्यंत साडेपाच हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील पार्टीवर छापा – सविस्तर बातमी
पुणे शहरात वर्षभरात घडलेले गंभीर गुन्हे, तसेच आकडेवारी याबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, संजय पाटील, राजेश बनसाेडे, तसेच उपायुक्त हिंमत जाधव, राजलक्ष्मी शिवणकर, डाॅ. राजकुमार शिंदे, मिलिंद मोहिते, कृषीकेश रावले, संभाजी देशमुख, संदीप भाजीभाकरे उपस्थित होते.
शहरात घडलेले गंभीर, आकडेवारीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी दिले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. ‘महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. मतदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाब आणण्याच्या घटना घडणे, तसेच अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. गैरप्रकार आढळून आल्यास त्वरीत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
गुंड टोळ्यांविरुद्ध कडक कारवाईचे धोरण
शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच गंभीर गु्न्ह्यात देशी बनावटींचा पिस्तुलांचा वापर विचारात घेतल्यास पोलिसांनी गुंड टोळ्यांविरुद्ध कडक कारवाईचे धोरण हाती घेतले आहे. गुंड टोळ्यांचे म्होरके, साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. हडपसरमधील टिपू पठाण टोळीतील सराइताचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. गुंड टोळ्यांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल आहे. टोळ्यांचे आर्थिक स्त्रोत, त्यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे.टोळ्यांना मिळणारे आथिक रसद तोडण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. बंडू आंदेकर, नीलेश घायवळसह शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट
‘गेल्या वर्षी देशभरात नवीन कायद्याची (भारतीय न्याय संहिता- बीएनएस) अंमलबजावणी करुन कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. बीएनएस कायद्याचे प्रशिक्षण, ई-साक्ष ॲपचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात झाली. ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा घडल्यानंतर तेथे तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेची व्हॅन पाठविण्यात येते. तेथील परिस्थितीजन्य पुराव्यांचे संकलन तज्ज्ञांकडून करण्यात येते. परिस्थितीजन्य पुरावे संकलन, साक्षीद्वारे गंभीर गुन्हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षेचा टक्का (कन्व्हिक्शन रेट) वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, हे प्रमाण पुढील वर्षात ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.























