६ लाखांचा मुद्देमाल जप्त
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील शेतकर्यांची दुभती जनावरे चोरणार्या सराईत टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिकगुन्हे शाखेसह ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणून, जनावरांसह पीकअप असा ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत पुणे ग्रामीण पोलिसांनी शेळ्या-बोकडांसह दुभती जनावर चोरट्यांच्या टोळीला अटक करीत शेतकर्यांना दिलासा दिला आहे. नरेश भाऊ मोरे (वय ३९) आणि सुरज अशोक पारधी (वय १९, दोघेही रा. कळंबड, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांना अटक केली आहे.
पुण्यात १८ लाख ७२ हजार बेशिस्त चालक जाळ्यात – सविस्तर बातमी
जिल्ह्यातील जुन्नर परिसरात पहाटेच्या सुमारास शेतकर्यांची दुभती जनावरे चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यासंबंधी ओतूर, जुन्नर, आळेफाटा पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल झाले. दरम्यान, जनावरांच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकर्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी विशेष पथकाची स्थापना केली. त्यानुसार तपासाला गती देण्यात आली. तक्रारदारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तब्बल १२० किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पिकअप वाहनातून जनावरांची चोरी केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
जनावरे चोरून नेणारे प्रत्येक वाहन माळशेज घाटातून मार्गस्थ होत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणानंतर सराईत आरोपी नरेश मोरे हा जनावरांची चोरी करीत असून, तो खुबी गावातील जंगलात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने २४ डिसेंबरला सराईत मोरेसह दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ओतूरमधील दोन, आळेफाटा परिसरातील दोन, जुन्नरमधील एका गुन्ह्यांची उकल केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय महादेव शेलार, एपीआय लहू थाटे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, नदीम तडवी, दीनेश साबळे, रोहित बोंबले यांनी केली.
शेळ्या-बोकड, म्हशी मिळवून दिल्या
कायदा सुव्यवस्था राखण्यासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या रांजणगाव एमआयडी, ओतूर, स्थानिक गुन्हे शाखेने शेतकर्यांचे पशुधन मिळवून देत दिलासा दिला आहे. आठवड्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शेळ्या-बोकडं चोरणार्या टोळीचा पर्दापाश केला. तर म्हशी चोरणार्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.
























