ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया, जीएसटीसह पाच रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण; यशस्वी उमेदवारांचा गौरव
marathinews24.com
पुणे – अनुसूचित जातीच्या तरुणांना रोजगारक्षम बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात कौशल्य विकास प्रमाणपत्र वितरण व यशोगाथा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तंत्रज्ञानाधारित विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील १५० अनुसूचित जातीच्या तरुणांना यावेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
वारीत सौरऊर्जेची साथ; वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंगची अभिनव सुविधा – सविस्तर बातमी
साताऱ्यातील पोवई नाका येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (वायसीआयएस) परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील रिसर्च फाउंडेशनच्या सी-थ्री-आय (CIII) इमारतीतील अत्याधुनिक इनक्युबेशन केंद्रात हा कार्यक्रम झाला. ‘बार्टी’च्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंडे (आयएएस) आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत राज्यातील पात्र उमेदवारांना ग्राफिक डिझाइनिंग, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, आयटी हेल्प डेस्क असिस्टंट, जीएसटी असिस्टंट आणि डेस्कटॉप पब्लिशिंग (डीटीपी) या आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवलेल्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा मांडत इतर तरुणांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे होते. बदलत्या तंत्रज्ञानाशी सातत्याने जुळवून घेत कौशल्य वृद्धीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रमुख पाहुणे म्हणून ‘बार्टी’च्या कौशल्य विकास विभागाचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड आणि समाजकल्याण विभाग, सातारा येथील उपायुक्त उमेश घुले उपस्थित होते. त्यांनी अनुसूचित जातीच्या युवकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देत या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी ‘बार्टी’च्या कार्यालय अधीक्षक प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई तसेच कर्मवीर भाऊराव पाटील रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुंदन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे व्यवस्थापक वैभव निमगिरे, कर्मवीर भाऊराव पाटील रिसर्च फाउंडेशनचे व्यवस्थापक अभिजित पवार आणि प्रशिक्षण समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांनी केले. या उपक्रमातून प्रशिक्षित झालेल्या १५० कुशल तरुणांमुळे राज्याच्या डिजिटल व औद्योगिक क्षेत्राला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची पायाभरणी झाल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
























