नागरिकांनी नियोजन करूनच प्रवास करावा वाहतूक पोलिसांकडून आवाहन
marathinews24.com
पुणे – रामनवमीनिमित्त शहरात मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी चार ते रात्री १० या वेळेत अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तृतीयपंथीयांना सन्मान व न्याय देणारे विधेयक – सविस्तर बातमी
बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरात मिरवणुका निघणार असल्याने विश्रामबाग आणि लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद किंवा वळवली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना निर्बंध लागू राहतील. विश्रामबाग विभागात पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने टिळक रस्त्याने वळवून पुढे अलका टॉकीज चौक आणि खंडोजी बाबा चौक मार्गे सोडण्यात येणार आहेत.
लष्कर भागात वाय जंक्शनहून एम. जी. रोडकडे येणारी वाहतूक थांबविण्यात येणार आहे. मिरवणूक पुढे सरकत राहिल्यानुसार १५ ऑगस्ट चौक, महमंद रफी चौक आणि कोहिनूर हॉटेल परिसरात टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवली जाणार आहे. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ती ईस्ट स्ट्रीट, भोपळा चौक, कुरेशी मस्जिद आणि सेंटर स्ट्रीट मार्गे सोडण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या मार्गानुसार वाहतूक नियंत्रणात सतत बदल होत राहणार असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





















