रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे वक्तव्य
marathinews24.com
पुणे – शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग १९ किमी प्रति तासावरून २२ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात यश आले असले, तरी वेग वाढताना अपघात वाढता कामा नये. पुढील काळात शहराच्या वाहतुकीचा वेग २६ किमी प्रतितास होईल , अशी आशा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणे शोधून तेथे विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी लवकरच एआय आधारित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल, असेही त्यांनी सांगितले. “वेग वाढवणे आणि अपघात कमी करणे, हे दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करणार आहोत,” असे आयुक्तांनी ठामपणे नमूद केले.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी ६०० प्रकरणे नोंदली जात असताना, आता ही संख्या ७५०० पर्यंत पोहोचली आहे. “दारू पिऊन वाहन चालवाल तर पाहा, कारवाई अटळ आहे,” असा इशारा त्यांनी दिला. अशा चालकांवर दंडात्मक कारवाईसह सार्वजनिक स्वरूपात ‘सत्कार’ केला जाईल, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपरोधिक शब्दांत सांगितले.
ट्रिपल सीटने दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात विशेष ड्राईव्ह राबवण्यात येत असून, नियमभंग करणाऱ्यांची गाडी तब्बल ६ महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे. रस्त्यावर हिरोगिरी करणाऱ्यांना आता दणका देण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या, निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या किंवा कायद्याचे उल्लंघन करणारे रिल्स बनवणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल. “फॅशन, फूड ठीक आहे, पण कायद्याचे उल्लंघन करणार्यावर कारवाई होणारच,” असे आयुक्तांनी ठामपणे सांगितले. गुन्हेगारीला अप्रत्यक्षपणे उत्तेजन देणाऱ्यांनाही माफ केले जाणार नाही.
शहराच्या सुरक्षिततेसाठी गँगस्टरविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील. गुन्हेगार “जिंकू वा हरू, पण त्यांनी सामाजिक शांतता भंग केल्यास पण अशांवर कारवाई होणारच ” असेही आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मुद्देमाल वितरणही करण्यात आले. सडक सुरक्षा – जीवन रक्षा” हा संदेश देत, नागरिकांनी नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.






















