गतिरोधक दिसून येत नसल्याने अपघाताची भीती
marathinews24.com
पिंपरी : भोसरी आणि आळंदी या तीनही ठिकाणांहून येणारे रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे मॅगझीन चौक. सतत होणारी वाहतूक आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणारा हा चौक. या चौकातील वाहतुकीला उपयोगी पडणार्या सर्व सोयीसुविधा अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र नेमके याच चौकात गतिरोधकावरील पांढरे पट्टे गायब आहेत. यामुळे गतिरोधक लक्षात न आल्याने वाहनांना अपघाताचा धोका संभवत आहे. तरी पालखीच्या पार्श्वभूमीवर या मार्गातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होत आहे.
पालिकेचा पाणीपुरवठ्यावर उत्पन्नापेक्षा खर्च अधिक – सविस्तर बातमी
मॅगझिन चौकातील गतिरोधकांची उंची जास्त आहे. दररोज प्रवास करणार्या वाहनचालकांना येथील गतिरोधक लक्षात येतात. परंतु पालखी मार्ग असल्याने या मार्गावर तीर्थक्षेत्र आळंदी, साईबाबा मंदिर आदी ठिकाणी येणारे भाविकदेखील मोठे आहेत. ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्र्यातून येतात. त्यांच्या हे गतिरोधक लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका संभवत आहे. यासाठी संबंधित विभागाने येथील गतिरोधकांची पाहणी करून आवश्यक तेथे पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होत आहे.
गतिरोधकांवरून वाहन गेल्यानंतर ज्यांना मणक्याचे, पाठीचे, मानेचे काही ना काही विकार आहेत अशा सर्वच प्रवाशांना हे धोकादायक ठरू शकते. त्याचप्रमाणे ज्यांना अगोदरपासून आजार नाहीत अशा लोकांनादेखील मानेचे, पाठीचे आणि मणक्याचे विकार जडू शकतात. त्याचप्रमाणे गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे गाडी गतिरोधकांवर आपटत आहे. यामुळे वाहनांचेदेखील नुकसान होत आहे.
पुणे-आळंदी मार्गावरील वडमुखवाडी येथील तापकीर चौकातदेखील अशीच परिस्थिती आहे. बाजूलाच असलेल्या मंगल कार्यालयांमुळे कायम येथे विविध ठिकाणांवरून नागरिक येत असतात. त्यांच्या येथील गतिरोधक लक्षात न आल्याने अपघाताचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत.