पोलिस चार मृत्यूंवर ठाम; आणखी पाच बळींच्या कुटुंबीयांचा दावा
marathinews24.com
पुणे – विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा नेमका किती, यावरून आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे पोलिस अधिकृतरीत्या केवळ चार जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा दावा करत असताना, त्याच परिसरातील आणखी पाच जणांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूमागेही विषारी दारूच कारणीभूत असल्याचा ठाम दावा केला आहे. त्यामुळे मृत्यूंची खरी संख्या लपविली जात आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
बाप गेला… आता सातवीत शिकणाऱ्या मुलीचे काय ? – सविस्तर बातमी
विजय शर्मा, यशवंत पवार, सॅम्युअल धैर्यम, राजू अवचरे आणि जाधव या पाच जणांचा मृत्यूही विषारी दारू प्रकरण उघडकीस आलेल्या कालावधीतच झाला. विशेष म्हणजे हे सर्वजण हडपसर, पांढरे मळा, उरूळी कांचन आणि ससाणेनगर परिसरातील रहिवासी होते. त्यांना दारूचे व्यसन होते आणि त्यांनी याच भागातील हातभट्टी दारूचे सेवन केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एकीकडे पोलिस चार मृत्यूंच्या आकड्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे या पाच मृतांच्या कुटुंबीयांच्या वेदना वेगळेच वास्तव मांडत आहेत. काहींना दारू पिल्यानंतर उलट्या, पोटदुखी, अस्वस्थता आणि प्रकृती बिघडल्याची लक्षणे दिसली. काही जण घरातच विव्हळत पडले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटना विषारी दारू प्रकरणाच्या कालावधीतच घडल्या, हा योगायोग मानायचा का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
पुणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, “आमच्या नोंदीनुसार आणि उपलब्ध अहवालांनुसार चारच मृत्यूंची नोंद आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यामुळे अनेक प्रश्न अधिकच गडद झाले आहेत. जर या पाच जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला नसेल, तर नेमके कशामुळे झाला? त्यांचे शवविच्छेदन अहवाल काय सांगतात? त्यांच्या मृत्यूंची स्वतंत्र चौकशी झाली का? याची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
विषारी दारूने चारच नव्हे तर अधिक बळी घेतले असतील, तर त्याची नोंद होणे गरजेचे आहे. कारण आकडे कमी दाखविल्याने वास्तव बदलत नाही. उलट मृतांच्या कुटुंबीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम होत असल्याची टिका नागरीक करत आहेत. प्रश्न केवळ मृत्यूंच्या आकड्याचा नाही; तर सत्य नेमके कुठे दडले आहे, याचा आहे.






















