पुणे जिल्ह्यातील सुपे घाटात अपघात; ४ विद्यार्थी जखमी
marathinews24.com
पुणे – विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या एसटी चालकाचे नियंत्रण सुटून वळणावर गाडी पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात चार विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) सकाळी साडेसातच्या सुमारास सुपे घाटातील वळणावर घडली. अपघातानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह घाटातून जाणार्या वाहन चालकांनी बचावकार्य राबवले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी अपघाताची माहिती घेउन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
पुण्यात साउंड व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा – सविस्तर बातमी
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (सुपे, ता. बारामती ) याठिकाणी विद्यार्थ्यांना विविध भागातून घेऊन जाणारी एसटी बुधवारी सकाळी सातच्या सुमारास सुपे घाटातून मार्गस्थ होत होती. त्यावेळी घाटातील पहिल्या वळणावर एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. बसमध्ये सुमारे ४० ते ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते. अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एस. टी महामंडळाची बस पाटस मार्गावरून कुसेगाव, पडवी परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन सुप्याच्या दिशेने निघाली असता अपघात घडला.
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडीने दोन पलट्या मारल्या
घाटातील पहिल्या वळणावर बस चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडीने दोन पलट्या मारल्या. त्यामुळे एसटीतील विद्यार्थी आतमध्ये पडल्यामुळे काहींना दुखापतही झाली. रस्त्यालगत संरक्षक कठडा नसल्याने गाडीने दोन पलटी मारल्याचे दिसून आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांसोबत संवाद साधून विचारपूस केली. तसेच याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह एसटी प्रशासनाने मदत करण्याचे आदेश दिले होते.
वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या बससाठी सुरक्षा तपासणी अहवाल ठेवण्यात यावा. त्याचबरोबर सुपे घाटातील अपघातप्रवण वळणावर संरक्षक कठडा, अन्य आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी पालकांनी केली आहे. तसेच बसला झालेल्या अपघातामुळे शालेय वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस अधिकार्यांकडून अपघाताची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील त्यांनी चर्चा केली.




















