गोळीबार, कोयत्याने वार करीत चढविला हल्ला
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणाच्या दिशेने गोळीबार करीत त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केला. ही घटना १५ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास विश्रांतवाडीतील पंचशीलनगरात घडली आहे. खूनानंतर टोळके पसार झाले असून, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
धनकवडीत घरातून लॅपटॉप, मोबाइल चोरीला – सविस्तर बातमी
याप्रकरणी टोळक्याविरूद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. सिंहगड रोड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तौफिक शेख याच्यासह साथीदारांविरूद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव तेलंगी आणि आरोपी तौफिक शेख यांच्यात काही दिवसांपुर्वी वादविवाद झाले होते. त्याच रागातून आरोपीने १५ एप्रिलला रात्रीच्या सुमारास पंचशीलनगरात आरोपींना बोलावून घेतले. त्याठिकाणी गौरव आला असता, टोळक्याने सुरूवातीला त्याच्या दिशेने पिस्तूलातून गोळीबार केला. मात्र, गोळी न सुटल्याने टोळक्याने गौरवला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्याची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी गौरवला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संपतराव राउत तपास करीत आहेत.






















