1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद
marathinews24.com
पुणे – राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेत दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे कामकाज गतीने सुरू आहे, याकामात अधिक गतीमानता येण्याकरीता विशेष उपाययोजना करण्याकरीता आयुक्तालयाच्यावतीने निर्देश देण्यात आले आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जून्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यात येणार नाही.
तथापि, वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांच्या वाहनांचे कामकाज करण्यात येईल. १६ जून २०२५ पासून एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांचे कामकाज करण्यात येणार नाही, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.