प्रशासानचे लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी तयार करुन केले आंदोलन
marathinews24.com
पुणे – शहरातील फातिमाननगर चौकातून वानवडीकडे वळण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर भागातील रहिवासी, वाहनचालकांना रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक आणि वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत असल्याने प्रशासानचे लक्ष वेधण्यासाठी रहिवासी, तसेच सेव्हा पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटकडून सोमवारी मानवी साखळी तयार करुन आंदोलन करण्यात आले.
सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविणे, तसेच वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी फातिमानगर चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल )बंद करण्यात आले. तेथून वानवडीकडे जाणारा मार्ग दुभाजक टाकून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वानवडीकडे जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांना वळसा मारुन जावे लागत आहेत. पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस, तसेच महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी रहिवासी आणि सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या संस्थेने मानवी साखळी तयार करुन आंदोलन केले.
फातिमाननगर चौकात पूर्वी सिग्नल होता. सिग्नलमुळे स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडता येत होता. आता फातिमानगर चौकात मोठा दुभाजक टाकण्यात आला आहे. जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक आशा शिंदे, नाझीर खान यांनी केली. फातिमानगर चौकातील सिग्नल पुन्हा सुरु करावा. सिग्नल सुरू केल्याानंर तेथे स्पष्ट दिसणारे पादचारी पट्टे आखावेत. दुभाजकाऐवजी प्लास्टिकचे तात्पुरते खांब (बोलार्डस्) बसवावेत. पादचारी पूल आणि भुयारी मार्गाचा वापर कोणी करत नाहीत, अशी मागणी रहिवाशांनी केली.






















