आपत्ती व्यवस्थापन कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
marathinews24.com
मुंबई – महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ( दि. २६) भेट देऊन मुंबई शहर आणि उपनगरातील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात गेल्या १२ तासात सुमारे २५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने शहरात जागोजागी पाणी साचले होते. घाटकोपर, सायन, मीलन सबवे, अंधेरी सबवे, किंगसर्कल, हिंदमाता अशा सखल परिसरातील पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी
दरवर्षीच्या तुलनेत यंदा १५ दिवस आधीच मान्सून एवढा पाऊस पडला, त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मात्र यापुढे अशी परिस्थिती राहणार नाही असेही याप्रसंगी नमूद केले. वरळी येथील मेट्रो – ३ च्या भूमिगत स्टेशनला जोडणारी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली भिंत पडल्याने या स्थानकात पाणी गेले. हे पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून कायमस्वरूपी भिंत उभारल्यावर ही समस्या दूर होईल असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मॉन्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली असून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मंत्रालयात, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुण्यात आणि मी स्वतः मुंबई मनपामध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याने राज्याची यंत्रणा सक्रिय असल्याचे यासमयी सांगितले. ७ जूनपर्यंत मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण झाल्यावर अजून दिलासा मिळेल. यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.