कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा समारोप
marathinews24.com
पुणे – युवा पिढी, पर्यावरण तज्ज्ञ, भूगावातील नागरी समस्या निवारण समिती राम नदीचे पुनरुज्जीवन करून दाखवतील असा निर्धार कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आज (दि. १८) व्यक्त करण्यात आला.
अक्षय तृतीया व आंबा महोत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी
कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात तिसऱ्या दिवशी (दि. १८) नागरी समस्या निवारण समिती, भूगांवला ‘राम नदी सेवक सन्मान’ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. अनिल निवृत्ती करंजावणे, पंढरीनाथ शिवराम शेडगे, शिवाजी काशीनाथ रणवरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पुरस्कार स्वीकारला. पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांचा मोठा सहभाग लाभला.
सर्वांच्या सहकार्याने चित्र बदलू शकते-कृष्णकुमार गोयल
राम नदीचे प्रदूषण संपवण्यासाठी त्वरित उपाययोजना करायला हव्यात, असे आग्रही मत नोंदवून कृष्णकुमार गोयल म्हणाले, प्रदूषण, राडारोडा, अतिक्रमण, सांडपाणी, प्लास्टिक कचरा अशा असंख्य समस्यांनी राम नदी वेढलेली आहे. परंतु सर्व स्तरातील नागरिक, युवा पिढी, सामाजिक संस्था यांनी सहकार्य केल्यास हे चित्र आपण बदलू शकतो असा ठाम विश्वास आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने राम नदीविषयी तयार केलेले लघुपट, पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून हा महोत्सव म्हणजे सकारात्मक प्रयत्न असल्याचे जाणवते. ते पुढे म्हणाले, चित्रपट हा समाजजीवनाचा आरसा आहे. या महोत्सवादरम्यान लघुपटांच्या माध्यमातून नदीचे वास्तव मांडले गेले आहे. यातून प्रेरित होताना फक्त महोत्सव करून आम्ही थांबणार नाही तर नदी स्वच्छ, सुंदर व अविरल व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
राम नदी संसद आयोजित करण्याचा मानस-वीरेंद्र चित्राव
वीरेंद्र चित्राव म्हणाले, मातेसमान समजल्या जाणाऱ्या नद्यांची अवहेलना होऊ नये ही जागृती कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने झाली आहे. भविष्य काळात राम नदीविषयी विविध सामाजिक संस्था आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून राम नदी संसद आयोजित करण्याचा मानस आहे. त्याच प्रमाणे दर महिन्याला राम नदी परिक्रमा आयोजित करून नदीची ओळख करून घेत लहानमोठ्या उपक्रमातून नदीची शुद्धता टिकविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
देशाचे देणे लागतो..
सत्कार स्वीकारल्यानंतर अनिल करंजावणे म्हणाले, राम नदी परिक्रमा केल्यानंतर निर्मळ असलेली नदी अशुद्ध झाल्याचे पाहून अतीव दु:ख झाले. मानव निर्मित प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नदी स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. देशाचे देणे लागतो या भूमिकेतून अविरतपणे कार्यरत आहोत. या पुरस्काराच्या माध्यमातून पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप पुढील कार्यास प्रोत्साहन देणारी ठरेल.
























