गृहमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाई
marathinews24.com
पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करत मध्यरात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. या पदाधिकाऱ्यांना तब्बल १६ तास पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले.तसेच, त्यांच्या मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या कारणास्तव मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोहोचला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. युवक काँग्रेसने या कारवाईचा तीव्र निषेध करत म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा, आपले मत मांडण्याचा आणि सरकारविरोधात आवाज उठवण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र कोणतेही आंदोलन होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना मध्यरात्री घरातून ताब्यात घेणे, त्यांना तब्बल १६ तास पोलिसांच्या ताब्यात ठेवणे. त्यांचे मोबाईल फोन जप्त करणे ही अत्यंत गंभीर बाब असून लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
ताब्यात घेण्यात आलेले पदाधिकारी
अक्षय जैन – चेअरमन, मीडिया विभाग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
स्वप्नील नाईक – अध्यक्ष, पर्वती ब्लॉक काँग्रेस
राजू ठोंबरे – अध्यक्ष, वडगाव शेरी ब्लॉक काँग्रेस सद्दाम शेख – उपाध्यक्ष, युवक काँग्रेस
गौरव बाळंदे – अध्यक्ष, कसबा विधानसभा युवक काँग्रेस
पोलिसांचा मोठा फौजफाटा; मध्यरात्रीची कारवाई चर्चेचा विषय
युवक काँग्रेसचे राज्य मीडिया विभागाचे चेअरमन अक्षय जैन म्हणाले, “दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शांततामय मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आणि आता पुण्यातही शांततेत आंदोलन सुरू असतांना कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेण्यात आले. विरोधाचा आवाज दाबण्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर केला जात आहे.
आमच्याकडून कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका नव्हता. मग आम्हाला तब्बल 16 तास ताब्यात का ठेवण्यात आले? आमचे मोबाईल फोन कोणत्या अधिकाराखाली ताब्यात घेण्यात आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर द्यावीत. देशात लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात शांततामय पद्धतीने आंदोलन करणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
अखेर अक्षय जैन यांनी म्हटले की “पोलिसांच्या दडपशाहीने युवक काँग्रेसचा आवाज दाबला जाणार नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी युवक काँग्रेस यापुढेही शांततामय व लोकशाही मार्गाने संघर्ष करत राहील.
























