वर्दळीच्या बाजारपेठेत घटना घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली
marathinews24.com
दौंड – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील गणपती मंदिराजवळ इमारतीची भिंत कोसळून एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि २६) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. ताराबाई विश्वचंद्र आहेर (वय ७५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
भामा आसखेड धरणाजवळ मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज पडून मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई आहेर त्यांच्या ‘वैष्णवी फ्लॉवर मार्ट’ दुकानात बसल्या होत्या. सोमवारी पावसामुळे भिंत फुगून अचानक कोसळली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उप-जिल्हा रुग्णालय, दौंड येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांना घटनेची माहिती फोनवरून दिली आहे.
प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नेहमीच्या वर्दळीच्या बाजारपेठेत घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक प्रशासनाकडून अशा जीर्ण इमारतींबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.