महिलांना विश्वासात न घेता ग्रामसभेत ठराव
marathinews24.com
माळशिरस – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातलं पिंपरी गाव… साधारण चार ते साडेचार हजार लोकसंख्या असलेलं दुष्काळी पट्ट्यातील हे गाव. पावसाच्या पाण्यावर थोडीफार शेती करून गावकरी आपला उदरनिर्वाह चालवतात. गावातील बहुतांश पुरुष रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले असतात, तर गावातील आया-बहिणी स्वतःच्या शेतात काम करत करत ..दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत असतात. गावात ना पाण्याची योग्य व्यवस्था, ना रोजगाराची साधनं, ना शेतीला स्थैर्य… अशा अनेक संकटांमध्ये पिंपरी गाव आजही जगण्यासाठी झगडत आहे.
हांडेवाडीत अवैध हातभट्टी दारूविक्री रडारवर – सविस्तर बातमी
मात्र या सगळ्या गंभीर प्रश्नांवर उपाय शोधण्याऐवजी गावातील काही राजकीय पुढारी आणि नव्याने “गाव बदलणार”, “विकास घडवणार” अशा घोषणा देणारी मंडळी वेगळ्याच कामात व्यस्त असल्याचं चित्र समोर येत आहे. गावाच्या विकासासाठी मोठमोठे ग्रुप तयार करून राजकारणात येण्याच्या आरोळ्या देणाऱ्यांनीच आता जुन्या पुढाऱ्यांशी मिलीभगत केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
त्याचं कारण म्हणजे पिंपरी गावात सुरू होणारे बियर बार. गावात पाणी नाही, रोजगार नाही, तरुणांच्या हाताला काम नाही; पण बार सुरू करण्यासाठी मात्र पुढाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या निर्णयाबाबत गावातील महिलांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यांच्या मतांचा साधा विचारही करण्यात आला नाही. ग्रामसभा आयोजित केली जाते आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ठराव पास करून या बारना परवानगी दिल्याचा आरोप गावातील लोकांकडून होत आहे.
गावातल्या महिलांच्या संसारात विष कालवण्याचं काम या निर्णयातून होत असल्याची संतप्त भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आधीच दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत असताना गावात आणखी बियर बार सुरू करण्यामागे नेमकं कोणाचं हित दडलं आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे “परिवर्तन”, “नवीन विचार”, “गावाचा विकास” अशा घोषणा देणारे नवखे राजकारणीही या विषयावर गप्प आहेत. गावातील मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी तेही जुन्या पुढाऱ्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे “सगळेच एका माळेचे मणी” ही भावना आता ग्रामस्थांच्या मनात अधिक ठसत चालली आहे.
पिंपरी गावाला आज खऱ्या अर्थाने विकास हवा आहे — पाणी, शेती, रोजगार आणि शिक्षणाचा. पण गावाच्या भवितव्याचा विचार करण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी गावाला व्यसनाच्या विळख्यात ढकलण्याचं काम होत असेल, तर गावातील जनतेने आता जागं होण्याची गरज आहे. नाहीतर उद्या गावाचा आवाज कायमचा दाबला जाईल आणि गावाच्या नावावर फक्त राजकारण उरेल.





















