दोन महिलांची प्रकृती बिघडली, नेपाळ सीमेवरील मार्ग बंद
marathinews24.com
पुणे – कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेले चार महाराष्ट्रीयन नागरिक पुरामुळे तिबेटमधील जिलोंग (केरुंग) शहरात अडकले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय वाहून गेल्याने जमिनीमार्गे नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यातच ऑक्सिजनची तीव्र कमतरता जाणवल्यामुळे दोन महिलांची प्रकृती खालावली आहे. स्मिता पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले, पूजा भोसले अशी अडकलेल्यांची नावे आहेत.
स्मिता पवार आणि योगिनी पाटील यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मानसरोवर परिसरातून तातडीने खाली आणले आहे. मात्र, तेथील वैद्यकीय सुविधा मर्यादित असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी काठमांडूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले आहे. संबंधित सर्वजण वैâलास मानसरोवर ग्रुप व्हिसावर चीनमध्ये गेले आहेत. त्यांचा व्हिसा ७ ऑगस्टला जारी करण्यात आला असून त्याची मुदत ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत वैध आहे.
पूरामुळे रस्ते मार्ग बंद झाल्याने चारही हिंदुस्थानीना जिलोंग येथून थेट काठमांडू येथे हेलिकॉप्टर किंवा अन्य हवाई मार्गाने आपत्कालीन स्थलांतराची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत हिंदुस्थानी अधिकार्यांनी चिनी प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून मदत करावी, अशी विनंती अडकलेल्या गटाच्यावतीने केली आहे. ‘दोन महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे. जीव वाचविण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.


























