सुभाष देशपांडे यांची पत्रकार परिषेदेत माहिती
marathinews24.com
पुणे – तळागाळातील नवोपक्रमांना चालना देत ग्रामीण व निमशहरी भागातील युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर – ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन (एसीआयसी-जेपीआयए) या इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन येत्या गुरुवारी (ता. २ जुलै) सकाळी १०.३० वाजता ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी प्राधिकरण येथील मनोहर सभागृहात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) संस्थापक संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते होणार होणार आहे, अशी माहिती ज्ञानप्रबोधिनीचे विश्वस्त सुभाष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी इनोव्हेशन सेंटरच्या संस्थापक संचालिका संगीता कुलकर्णी, मुख्य नवोपक्रम (इनोव्हेशन) अधिकारी ॐकार गुर्जर, देसाई ब्रदर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पारेख व सीएसआर प्रमुख चंद्रकांत रावळ आदी उपस्थित होते.
कोथरूडमध्ये संत पूजन, वारीसाठी उपयुक्त साहित्य वाटप – सविस्तर बातमी
सुभाष देशपांडे म्हणाले, “उद्घाटन सोहळ्यास अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, देसाई ब्रदर्स लिमिटेड, ज्ञान प्रबोधिनी, विविध शासकीय विभाग, संशोधन संस्था, स्टार्टअप परिसंस्था, उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्रामधील या सेंटरची स्थापना अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच देसाई ब्रदर्स लिमिटेडच्या सहकार्याने करण्यात आली आहे. केवळ स्टार्टअप उभारणीपुरते मर्यादित न राहता, समुदायातील प्रत्यक्ष समस्यांवर आधारित नवकल्पनांना उद्योग, सामाजिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतरित करणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे.”
संगीता कुलकर्णी म्हणाल्या की, ‘समस्येपासून समाधानाकडे आणि समाधानापासून शाश्वत उद्योगाकडे’ या संकल्पनेवर आधारित ‘कम्युनिटी बेस्ड इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन प्रोग्रॅम’ राबविण्यात येणार असून, कल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत पूर्व-इन्क्युबेशन, इन्क्युबेशन आणि उद्योग विस्तार अशा टप्प्यांमध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या केंद्रामार्फत ग्रामीण युवक, स्वयं-सहाय्यता बचत गट, महिला उद्योजिका, शेतकरी उत्पादक संस्था, विद्यार्थी, संशोधक, सामाजिक उद्योजक, कारागीर तसेच प्रथमच उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. उपजीविका उद्योग, सामाजिक उद्यम आणि नवोपक्रमाधारित उद्योग अशा तीन स्वतंत्र उद्योजकता मार्गांद्वारे विविध घटकांना आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे त्या म्हणाल्या.
ॐकार गुर्जर म्हणाले, “बांबू आधारित उद्योग, कृषी व कृषी-जैवतंत्रज्ञान, औषधी वनस्पती, अन्न प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, महिला उद्योजकता, ग्रामीण उद्योग आणि सामाजिक नवोपक्रम या क्षेत्रांमध्ये उद्योगनिर्मितीला विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. उद्योजकांना डिझाईन थिंकिंग व उद्योजकता प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रोटोटाइप विकास, प्रयोगशाळा व मेकरस्पेस सुविधा, क्षेत्रीय चाचण्या, उद्योग व शासकीय संस्थांशी संपर्क, कायदेशीर व आर्थिक सल्ला, निधी व गुंतवणूकदारांशी जोडणी तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक परिसंस्था उभारण्यात येत आहे.
”इनोव्हेशन सेंटर केवळ स्टार्टअप इन्क्युबेशनपुरते मर्यादित नसून, समाजाच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित नवोपक्रमांना शाश्वत उद्योगांमध्ये रूपांतरित करणारे समुदायकेंद्रित व्यासपीठ आहे. ग्रामीण युवक, महिला, शेतकरी, कारागीर, संशोधक आणि नवोपक्रमकांच्या कल्पनांना दिशा, तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– संगीता कुलकर्णी, संस्थापक संचालिका, एसीआयसी-जेपीआयएफ





















