माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे
marathinews24.com
पुणे – मेक इन इंडिया’अंतर्गत आपल्या देशात चांगले काम होत आहे. मात्र गेल्या ५० ते ६० वर्षांत जे झाले नाही, ते लगेच साध्य होणार नाही. आपल्याला स्वदेशी संशोधन, विकासावर भर देण्याची गरज असून एखाद्या देशावर बंदी घालून ते साध्य होणार नाही, असे मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केले आहे.
10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण पदक – सविस्तर बातमी
ज्ञानप्रबोधिनी शाळेच्यावतीने संस्थापक संचालक आप्पा पेंडसे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आयोजित रुप पालटू या व्याख्यानमाले अंतर्गत आयोजित कार्यक्रमात माजी लष्कर प्रमुख नरवणे यांची मुलाखत पत्रकार सारंग दास्ताने यांनी घेतली. यावेळी नरवणे यांनी ’नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताची संरक्षण सिद्धता’ विषयावर संवाद साधला. त्यांनी देशाची सुरक्षा, चीन-पाकिस्तान, तंत्रज्ञान, लष्कराची पुनर्रचना, संरक्षण उत्पादन, लष्करातील महिलांना संधी अशा मुद्द्यांवर भाष्य केले.
नरवणे म्हणाले,ड्रोनची मोटार चीनमध्ये तयार होत आहे. तर औषध निर्मितीसाठीचे ‘एपीआय’ चीनमधूनच येतात. त्यामुळे एका देशावर बंदी घालून काही होणार नाही. युद्धाचे स्वरुप कायम बदलते असते. बदलत्या तंत्रज्ञानासह बदलत राहिले पाहिजे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून तंत्रज्ञानाचा वापर दिसलाच आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आता खासगी क्षेत्राला संरक्षण उत्पादनाला संधी मिळाली आहे. इंजिनासारखे महत्त्वाचे भाग आपण तयार केले पाहिजेत, ते अजून होत नाही. त्यामुळे देशातील उत्पादनासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पाकिस्तान सोबतचा वाद लवकर सुटणे कठीण असून,
अनिश्चित सीमांमुळे चीनबरोबर वाद आहेत. त्या बाबत १९ व्या फेरीनंतर थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे. पाकिस्तानबरोबरही सीमाविषयकच वाद असला, तरी तो प्रामुख्याने विचारसरणीचा वाद आहे. हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष, लोकशाही असलेला देश आहे. तर पाकिस्तान धर्माचे प्राबल्य असलेला, नावापुरती लोकशाही असलेला देश आहे.
देशातील भेदाचा फायदा परकीय शक्तींना
देशासमोर अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेची आव्हाने आहेत. बाह्य सुरक्षेसाठी लष्कर सज्ज आहे. अंतर्गत सुरक्षा हे लष्कराचे प्रमुख काम नसले.तरी आवश्यकतेनुसार लष्कराकडून मदत केली जाते. अंतर्गत सुरक्षा सर्वांनी मिळून हाताळावी लागेल. देशातील कोणत्याही भेदाचा फायदा परकीय शक्ती घेऊ शकतात. गेल्या काही वर्षांत अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने चांगले काम झाले आहे. नक्षलवाद, ईशान्येकडील राज्यांतील घुसखोरी ही आव्हाने आहेत. मात्र, त्यात कधीही वाढ होऊ शकते, याकडे नरवणे यांनी लक्ष वेधले. तर लष्कराची पुनर्रचना, थिएटर कमांड ही नवी कल्पना नाही. कारगिल युद्धानंतरपासून ही चर्चा सुरू आहे. 2019 मध्ये जनरल बिपीन रावत सरसेनाध्यक्ष झाल्यावर बदलाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, हे बदल करणे सोपे नाही. अधिकारी, जवानांना प्रशिक्षण देण्यापासून बरेच काही करावे लागणार आहे. संरक्षण दलांच्या तिन्ही दलांच्या समन्वयाने काम सुरू झाले आहे, असे नरवणे यांनी सांगितले.























