आमच्या बाईंची माया वटवृक्ष सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील – आयएएस तुकाराम मुंढे
marathinews24.com
बीड – (अनंत जाधव) – धडाडीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी कोणताही विधी न करता अस्थींचे विसर्जन पाण्यात केले नाही. आपल्यातच शेतात खड्डा खोदून अस्थी ठेऊन तिथे वडाचे झाड लावले आहे. त्यांच्या पुरोगामी विचारांचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे. विज्ञान आणि विवेकवादी विचार जपत त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांनी अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस साजरा – सविस्तर बातमी
आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर तुकाराम मुंढेंनी तिसऱ्याच दिवशी सर्व विधी पूर्ण केले. मुंढे यांनीच सोशल मीडियात पोस्ट करुन माहिती दिली. “आमच्या बाईंच्या (आईच्या) स्मृतीप्रत्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा विवेकवादी निर्णय मुंढे परिवारातर्फे घेतला आहे. निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
आम्ही त्याठिकाणी वडाचे झाड लावले आहे. जेणेकरून आमच्या बाईंची माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. हा वटवृक्ष आमच्या बाईंच्या मायेची सावली आणि जीजींचे आशीर्वाद बनून पिढ्यानपिढ्या बहरत राहील, अशी भावनिक आणि रुढी परंपरेला फाटा देत आपण पुढे जात असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आम्ही कोणत्याही प्रकारचा दहावा किंवा तेरवा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून, सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल, असे तुकाराम मुंढेंनी म्हटलं. तसेच, आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि बाईंच्या आठवणी आपल्या हृदयात कायम जपून ठेवाल, हीच नम्र अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला बाई म्हणून संबोधित असू, तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या जीजी होत्या.
तत्त्ववादी आणि कायदेशीर, संवैधानिक मार्गान कर्तव्य बजावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नुकतेच राज्याच्या आपत्ती व निवारण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली. दिव्यांग कल्याण विभागातही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती. त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते पश्चिम बंगालचा दौरा सोडून बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या मूळगावी पोहोचले होते.





















