तरुणावर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विवाहाच्या आमिषाने जाळ्यात ओढून फसवणूक केल्याने परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. तरुणीची फसवणूक करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली त्रिभुवन (वय २४, रा. भारती विद्यापीठ रुग्णालय परिचारिका वसतिगृह, धनकवडी, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे.
दहशतीच्या बळावर आंदेकर टोळीने कमाविली १८ कोटी रुपयांची मालमत्ता – सविस्तर बातमी
जिजा अण्णा त्रिभुवन (वय ४३, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैभव सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशालीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास भारती विद्यापीठ रुग्णालयाच्या परिचारिका वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली ही धनकवडीतील भारती रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. तिची वैभव सातपुते याच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने वैशालीशी संबंध तोडले. त्याने विवाह करण्यास नकार दिला. शारिरिक आणि मानसिक त्रासामुळे मुलगी वैशालीने ८ सप्टेंबर रोजी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे वैशालीचे वडील जिजा त्रिभुवन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी वैभव सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.





















