भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पानपट्टी चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन गल्ल्यातील ५ हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ऋषीकेश दामू खताळ (वय २५, रा. कामठे मळा, गुजरवाडी, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी समीर वाल्मिक खेडेकर (वय ३४, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) याला अटक करण्यात आली. याबाबत खताळ याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खोपोलीतील मंगेश काळोखे खून प्रकरण; दुसरा आरोपी पुण्यातून अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरातील राजामात भुयारी मार्ग परिसरात खताळची पानपट्टी आहे. आरोपी खेडेकर ११ जानेवारी रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास पानपट्टीजवळ आला. त्याने पानपट्टी चालक खताळ याला शिवीगाळ करुन पैशांची मागणी केली. खताळ याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन गल्ल्यातील पाच हजारांची रोकड लुटली. पानपट्टी चालक खताळ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून रुगणालयात उपचार सुरू आहेत, पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.
दरम्यान, पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात एकाला किरकाेळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत योगेश सुभाष गजमल (वय ३०, रा. गुरुदत्त सोसायटी, बालाजीनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजमले हे ११ जानेवारी रोजी बालाजीनगरमधील खुशबु हाॅटेलजवळ असलेल्या पानपट्टी जवळ थांबले होते. त्या वेळी तिघे जण तेथे आले. आमच्याकडे का बघतो ? अशी विचारणा करुन तिघांनी गजमला यांना बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे तपास करत आहेत.
























