सॉलंसी प्रमाणपत्रासाठी ५० हजारांची मागणी
marathinews24.com
बीड – सॉलंसी प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन २० हजार रुपये घेण्याचे मान्य करणारा परळीचा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. संशय आल्याने त्यांने लाच घेण्यास टाळाटाळ केली असली तरी त्यावर लाच मागितल्याचे पुरावे असल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दि.२० फेब्रुवारीला दुपारी परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी उघडकीस आली.
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड – सविस्तर बातमी
तक्रारदाराकडून सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तक्रारदाराकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचार विरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.






















