ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास
marathinews24.com
सोलापूर – राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सोलापूर ते पुणे या २६५ किलोमीटर अंतरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर तब्बल ५ टोल असून देखील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची लाट आहे. जर खड्ड्याची दुरुस्ती केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे बुजवण्यासाठी जाणुन बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.
देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी एक असलेल्या सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर असा परतीचा प्रवास करताना तब्बल ७५० रुपये टोल आकारला जातो. याशिवाय जीएसटी, मोटार वाहन नोंदणी कर भरल्यानंतर वाहन धारकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. असे असतानाही त्यांना दर्जेदार रस्ता मिळत नाही. अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. दर पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे.
टोल वसुली करूनही रस्त्यांची योग्य देखभाल न केल्याने संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील रस्त्यांसारखे दर्जाहीन महामार्ग बांधले जात असतील तर राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेचा काय उपयोग असा सवाल वाहन चालकांनी विचारला आहे. संपूर्ण २६५ किलोमीटरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा वाहनधारकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.





















