केज तालुक्यातील कोरडेवाडीतील घटना
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – पेरणीसाठी पैसे नसल्याने नैराश्येत जाऊन २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.०१) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरडेवाडी (ता. केज) गावात घडली आहे. घटनेने कोरडेवाडी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यात सिग्नल अन मुलीमुळे वाचला अनेकांचा जीव – सविस्तर बातमी
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस सुरू आहे. शेतकरी पेरणीची लगबग करीत असताना बाबूराव सुभाष यादव (वय २६ ) या शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे नव्हते. पीक कर्जासाठी बॅंकेत वारंवार चकरा मारून सुद्धा त्यांना कर्ज मिळाले नाही. शेतकऱ्याने नैराश्येतून शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संबंधित शेतकऱ्यांला वेळीच पीक कर्ज मिळाले असते तर अशी घटना घडली असती का? संबंधित शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार कोण? असे संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत.संबंधित शेतकऱ्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे .
























