आता कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट ई-बस धावणार
marathinews24.com
पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्थात, या ई-बसेस देखील ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. नव्याने घेण्यात येणाऱ्या या स्मार्ट ई-बसेससाठी विविध उत्पादकांकडून स्पर्धात्मक सादरीकरण मागविण्यात येणार आहेत, अशी माहितीदेखील सरनाईक यांनी दिली.
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल, त्याची डुलकी लागत असेल, झोप येत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई- बसेस मध्ये असणार आहे.
महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी, असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.