स्व. अजित दादांचे बीडच्या विकासकामाचे अधूरे स्वप्न पूर्ण होणार
बीड (अनंत जाधव) – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात मृत्यू झाल्यानंतर रिक्त झालेल्या बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांची धुरा कोण सांभाळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने पालकमंत्री पदाच्या जागेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे बीड आणि पुणे या दोन जिल्ह्यांचे पालकत्व सांभाळण्यासाठी देण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दि.३ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबईवरून बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमानाच्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. ते बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी , प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हाची पालकमंत्री पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता दिवंगत अजित दादा यांच्या अपघाती निधनानंतर बीड जिल्ह्याचे राहिलेले विकासकामाचे अधूरे स्वप्न दादाच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे ते नक्कीच पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे.
























