संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती
marathinews24.com
छ. संभाजीनगर – तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कुणाल चांदगुडे या तरुणाने डोंगरावरून उडी घेतल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडीलही दरीत कोसळले. या दुर्घटनेत कुणालसह त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी
आईची आर्त विनवणी; पण कुणाल ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता
कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा असताना त्याचे आई-वडील, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्याला खाली येण्यासाठी बराच वेळ समजावलं. आई संगीता यांनी मुलाला वाचवण्यासाठी आर्त विनवणी केली. मात्र, कुणाल अत्यंत तणावात असल्याने तो कोणाचंही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचा तोल गेला आणि ते कुणालसोबत दरीत कोसळले. हा प्रकार पाहून आईनेही मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि दुर्दैवाने त्यांचाही मृत्यू झाला.
कुणाल अभ्यासात होता हुशार; डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच…
कुणाल अभ्यासात हुशार होता. त्याने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. भविष्यात डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी तो NEET परीक्षेची तयारी करत होता. मात्र, एका क्षणाच्या तणावानंतर या कुटुंबावर काळाने घाला घातला. वडील मुरलीधर चांदगुडे हे व्यवसायाने MIDC मध्ये ड्रायव्हर होते. अत्यंत सामान्य आणि मध्यवर्गीय कुटुंबात राहून, दिवस-रात्र गाड्या चालवून ते आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी रक्ताचं पाणी करत होते. आयफोन घेण्याची मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून त्याला फोन घेऊन दिला. मात्र, नंतर फोनचे ईएमआय (हफ्ते) बाऊन्स होऊ लागले. यावरून आणि दैनंदिन खर्चावरून घरात वाद सुरू झाले.
याच वादाच्या रागातून कुणालने टोकाचं पाऊल उचलत खवड्या डोंगराचा कडा गाठला. मात्र, याच कारणामुळे कुणालने टोकाचं पाऊल उचललं, हे अद्याप पोलिस तपासातून निश्चित झालेलं नाही.
‘आयफोनमुळेच घटना घडली’ या चर्चेवर पोलिसांचं स्पष्टीकरण
या घटनेनंतर सोशल मीडियावर आयफोन आणि EMIच्या वादाला कारण ठरवलं जात आहे. मात्र, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या चर्चेबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. घटनेला २४ तासही पूर्ण झाले नसताना केवळ आयफोनमुळेच कुणालने हे टोकाचं पाऊल उचललं, असं निश्चितपणे सांगता येणार नाही. कुणाल तणावात होता आणि त्याला वाचवण्यासाठी पोलीस तसेच स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे या घटनेमागे नेमकं कारण काय होतं, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र एका कुटुंबातील तिन्ही व्यक्तींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


























