डॉ. अतींद्र सरवडीकर आणि डॉ. चैतन्य कुंटे यांनी केली मांडणी
marathinews24.com
पुणे – घराण्यांच्या भिंती उंच होत्या, अशा का ळातही स्वतःच्या कव्वालबच्चे परंपरेसह किराणा आणि जयपूर या घराण्यांची गायकी आणि प्रभाव स्वीकारून, आपली वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली घडविण्याची किमया बुजुर्ग उस्ताद रजब अली खाँ यांनी साध्य केली होती. त्यांनी कंठसंगीताप्रमाणे वाद्यसंगीतातही स्वतःची शिष्यपरंपरा निर्माण केली असल्याचे ‘किराना परंपरा’ या मालिकेद्वारे विशद करण्यात आले.
गझलेवर समीक्षात्मक भाष्य व्हायला हवे- भूषण कटककर – सविस्तर बातमी
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘किराना परंपरा’ या मालिकेतील पाचव्या सत्रात आज (दि. १५) उस्ताद रजब अली खाँ यांच्या गायनशैलीविषयीचे विवेचन संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य, गायक डॉ. अतींद्र सरवडीकर संगीताचे विद्यार्थी आणि जिज्ञासू रसिकांसमोर केले. कव्वालबच्चे, किराना आणि जयपूर-अत्रौली अशा तीन परंपरांतील गायकीचा संगम घडवणारे गायक असा उस्ताद रजब अली खाँ यांचा सन्मानपूर्वक उल्लेख सांगीतिक क्षेत्रात केला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. सरवडीकर आणि डॉ. कुंटे यांनी संशोधन आणि उपलब्ध ध्वनिमुद्रिकांच्या साह्याने उस्ताद रजब अली खाँ यांचे सांगीतिक योगदान उलगडले. जे. एम. रोड येथील स्वरमयी गुरुकुल सभागृहात कार्यक्रम झाला. फाऊंडेशनचे कार्यक्रम दिग्दर्शक प्रसाद भडसावळे, डॉ. भारती एम. डी., ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे, प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. चैतन्य कुंटे म्हणाले, उस्ताद रजब अली यांनी त्यांच्या काळात विशेष प्रचलीत आणि लोकप्रिय असलेल्या गायकींचे मर्म समजून, त्यातील आवडलेले अंश आत्मसात केले. त्या काळात घराण्यांची शिस्त कडक होती. गुप्तता राखली जात असे. घराण्याच्या शुद्धतेच्या विशिष्ट कल्पना होत्या. पण रजब अली यांनी तशाही परिस्थितीत जयपूर आणि किराणा घराण्यांची गायनशैली जाणून घेत, त्यातील काही अंश आपल्या गायनात मिसळण्याचै धैर्य दाखवले आणि स्वतःची संमिश्र गायकी मान्यताप्राप्त करून दाखवली.
डॉ. अतींद्र सरवडीकर म्हणाले, सुराकडे पाहण्याची दृष्टी रजब अली यांनी आत्मसात केली होती. उस्ताद अल्लादियाखांसाहेब आणि रजब अली, यांच्यात स्पर्धात्मक चुरस जरूर होती, पण मनातून दोघांनाही परस्परांविषयी आदर, सन्मान होता. एकमेकांचे श्रेष्ठत्व ते मानत होते. रजब अली यांच्या संगीतसाधनेला आध्यात्मिक बैठकही होती. कंठसंगीताप्रमाणेच ते तबला, जलतरंग आणि बीनवादक होते. लता मंगेशकर यांनाही रजब अली यांच्या गायकीविषयी आत्मीयता होती. त्यांच्या बंदिशी नंतर चित्रपटगीतांमध्येही आलेल्या आढळतात. उस्ताद रजब अली खान यांच्या चरित्राचा अभ्यास करताना एक अजब संदर्भ मिळाला होता. प्रा बी. आर. देवधर यांच्या घरी गायन सादर करताना खाँसाहेबांनी सा ग आणि सा प असे दोन स्वर एकावेळी कंठातून काढून दाखवले. ही किमया त्यांना साध्य होती. या बाबत मी प्रभा ताईंशी चर्चा केली असता तिबेटीयन मोन्क साधू ना अशी किमया साध्य होती अशी माहिती त्यांनी दिली होती. बहादुरी तोडी, पूरिया, नटकामोद आदी रागांमधील ध्वनिमुद्रणही यावेळी ऐकवण्यात आले.
विदुषी कल्पना झोकरकर यांनीही काही आठवणींना उजाळा दिला. वडील कृष्णराव मुजुमदार यांच्याकडून उस्ताद रजब अली यांच्याविषयी अनेक आठवणी, किस्से समजले. उस्ताद आमीर खाँ आमच्या घरी नेहमी येत असत. त्यांच्याकडूनही अनेक वैशिष्ट्ये समजली, असे त्या म्हणाल्या.























