‘प्रशासकीय’ स्वरुपाचा पोलीस आयुक्तांच्या पत्रानंतर सुप्रिया सुळे यांचे उत्तर
marathinews24.com
पुणे – शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्र पाठवून शहरातील गंभीर गु्न्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सुळे यांनी पोलीस आयुक्तांच्या पत्राला उत्तर पाठविले आहे. ‘शहरातील गुन्हेगारी घटल्याचा दावा हा प्रशासकीय स्वरुपाचा आहे. प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती वेगळी आहे. गुन्हेगारीची कीड फोफावत आहे. नागरिकांच्या मनात भीती आहे’, असे सुळे यांनी पोलीस आयुक्तांना पााठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
शहरात भरदिवसा पुणे-सातारा रस्त्यावर टोळीयुद्धातून तरुणावर गोळीबार करून कोयत्याने करण्यात आलेले वार, कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना, वाहनांची तोडफोड यांमुळे पुणेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा आरोप सुळे यांनी केला होता. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित करून त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. विषारी दारू प्रकरणानंतर सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, गुन्हेगारीत पुण्याचा क्रमांक पाचव्या स्थानावर आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. या टीकेनंतर पोलीस आयुक्तांनी सुळे यांना पत्र पाठविले. गेल्या दोन वर्षांतील गुन्हेगारी घटना, गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण याबाबतची माहिती या पत्रात आहे. ‘सन २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत घट झाली आहे’, असा दावा पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे केला होता.
या पत्राला सुळे यांनी उत्तर पाठविले आहे. ‘पोलिसांची आकडेवारी प्रशासकीय स्वरुपाची आहे. प्रत्यक्षात नागरिकांचे अनुभव वेगळे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल मला आद आहे. पोलिसांवर टीका करण्याचा हेतू नाही. मात्र, पुणे शहरात सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. गुन्हेगारी घटनांमधील क्रौर्य, दहशत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही’, असे सुळे यांनी म्हटले आहे.
‘म्हाळुंगे येथील झालेला चालकाचा खून, हडपसरमधील रुग्णालयात सापडलेली बाॅम्बसदृश वस्तू, नांदे गावात भरदिवसा कोयते उगारून दहशत माजविणे, तसेच कात्रज बाह्यवळण मार्गावर भरदिवसा रिक्षाचालाकावर झालेला हल्ला,अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना, भरदिवसा टोळीयुद्धातून झालेले खून अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे, ’ असे सुळे यांनी नमूद केले.
‘पोलीस आयुक्तांनी दिलेली आकडेवारी ही कागदोपत्री आहे. आकडेवारी आणि प्रत्यक्ष जनतेचा अनुभव हा वेगळा आहे. नागरिक घाबरले तर पोलिसांवरचा विश्वास कमी होईल. नागरिक पोलिसांशी संवाद साधणार नाही. शहरात जमावबंदीचे आदेश लागून गुन्हेगारी नियंत्रणात कशी येईल. शहराची नकारात्मक प्रतिक्रिया तयार केली जात आहे. असा पोलीस आयुक्तांचा दावा आहे. जर कोणी मुद्दामाहून असे चित्र निर्माण करत असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली का जात नाही’, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
नागरिकांची सुरक्षा हा सामाजिक चिंतेचा विषय
पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ राजकीय नाही तर सामाजिक चिंतेचा विषय आहे. पुणेकरांचा पोलीस दलाववरील विश्वास दृढ करण्यासाठी कठोर कारवाई, प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे’, असे सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे.





















