नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे
marathinews24.com
पुणे – ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे . आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक ( मुख्यालय) श्री. उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बिनवडे म्हणाले, नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रथम विक्री करारनामा प्रक्रियेसाठी नागरिकांनी नोंदणी कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सन २०२०-२१ पासून ही सुविधा सुरू केली आहे व यासाठी नोंदणी अधिनियम १९०८ आणि महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन नियम २०१३ अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे..
ई-एसबीटीआर हा मुद्रांक शुल्क भरण्याबाबतचा कायदेशीर व सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये डुप्लीकेशन व अन्य गैरप्रकारांना वाव राहणार नसल्याने त्याची विश्वासार्हता आहे. ई-एसबीटीआर या उपक्रमाची सन २०२४ पासून अंमलबजावणी सुरु असून अद्यापपर्यंत यामध्ये गैरप्रकार झाल्याची कोणतीही बाब समोर आलेली नाही.
ई-एसबीटीआरवर मुद्रित केलेले, डिजिटली स्वाक्षरी असलेले व ई-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदणीकृत केलेले दस्त हे मूळ दस्त म्हणून ग्राह्य धरण्यात येते, त्यामुळे हे दस्त बँकांनी कर्जविषयक अथवा इतर कामकाजासाठी मूळ दस्त म्हणून ग्राह्य समजण्यात यावे अशी सूचना बिनवडे यांनी केली.























