चार सख्ख्या बहिणींसह यशाबद्दल सर्वत्र कौतुक
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या जिवाचीवाडी येथील एका गरीब ऊसतोड मजूराच्या कुटुंबातील चार सख्या बहिणींनी पोलीस भरती मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून आपल्या बापाची मान उंचावली आहे. उषा हनुमंत चौरे , अर्चना हनुमंत चौरे , शीतल हनुमंत चौरे आणि गीतांजली हनुमंत चौरे या चार सख्ख्या बहिणींनी मेहनत, संघर्ष, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पोलीस भरतीत महाराष्ट्र पोलीस दलात एकाच वेळी स्थान मिळवले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बस सेवेचे लोकार्पण – सविस्तर बातमी
अत्यंत प्रतिकूल आणि घरात अठरा विश्व दारिद्र आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही, या चारही बहिणीनी अहोरात्र अभ्यासात सातत्य ठेवत मेहनत आणि त्यांच्या आई-वडिलांच्या अखंड कष्टाची जाण ठेवून हे अभूतपूर्व यश मिळवले असून, जिल्हाभरातून त्यांच्या मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
हनुमंत चौरे आणि त्यांची पत्नी हे दोघेही वर्षानुवर्षे ऊसतोड मजूर म्हणून कष्ट करत आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी “मुली शिकल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत,” या एकाच ध्येयाने त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. मुलींनीही गावातूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि आर्थिक संकटांचा सामना करत पोलीस भरतीचे स्वप्न मनात जिवंत ठेवले. एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी नियमित अभ्यास, कठोर शारीरिक सराव आणि स्वतःवरील विश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
त्याबद्दल जीवाचीवाडी ग्रामस्थांकडून आई-वडील आणि पोलीस दलात भरती झालेल्या या चार सख्ख्या बहिणींचा शालश्रीफळ देऊन गौरव केला आहे.
मुलीच्या यशाबद्दल काय म्हणाले आई-वडील
“आयुष्यभर कष्ट केले, पण मुलींना शिकवण्याचा निर्धार सोडला नाही. आज आमच्या चारही मुली पोलीस दलात भरती झाल्या, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नाही,” अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया त्यांच्या आई-वडिलांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील चार मुलींनी एकाच वेळी पोलीस दलात भरती होऊन आपल्या आई-वडिलांसह या यशामुळे जिवाचीवाडी गावाचे नाव उंचावले आहे.
चारही बहिणीकडून मौलाचा संदेश
ग्रामीण भागातील मुलींसाठी कोणत्याही यश संपादन करण्यासाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी,” असा मोलाचा संदेश या चारही बहिणींनी आपल्या यशाच्या माध्यमातून दिला आहे.






















