आयुष कोमकर हत्या प्रकरण
marathinews24.com
पुणे – तरूणावर पिस्तूलातून गोळ्यांचा वर्षांव करीत खून करणार्या आंदेकर टोळीच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेन मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आंदेकर कुटूंबिय एकाच मोटारीतून बुलढाण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तर यापुर्वी दोघा हल्लेखोरांसह रेकी करणार्या चौघांना अटक केली होती. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. उर्वरित पाच जणांच्या शोधार्थ पोलीस पथके मागावर आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळिक उपस्थित होते.
दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई – सविस्तर बातमी
यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेरगु, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आयुष उर्फ गोविंद कोमकर (वय १९, रा. नाना पेठ ) असे खून केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याणी कोमकर (वय ३७) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आंदेकर खूनातील आरोपी गणेश कोमकर याचा मोठा मुलगा आयुष कोमकर हा एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो ५ सप्टेंबरला त्याच्या १२ वर्षांच्या लहान भावाचा क्लास झाल्यानंतर दुचाकीवरून घरी इमारतीच्या पार्विंâगमध्ये आला. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या यश पाटील आणि अमन पठाण यांनी आयुषवर पिस्तूलातून गोळ्यांचा वर्षाव केला. तब्बल ११ गोळ्या झाडून हल्लेखोरांनी आयुषच्या शरीराची चाळण केली. त्याचवेळी आणखी दोन आरोपी त्याच परिसरात दुचाकी घेउन थांबल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान आयुषच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरात ९ गोळ्या असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.
प्रकरणातील दोघा हल्लेखोरांना गुन्हे शाखेने तातडीने अटक केली होती. त्यानंतर इतर सहाजणांना अटक केली आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, एपीआय दीपक बर्गे, उपनिरीक्षक मखरे, गौरव देव, विठ्ठल साळुंखे, शुभम देसाई, अभिनव लडकत, हेमंत पेरणे, नीलेश साबळे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, मयूर भोसले, सिद्धेश्वर वाघमारे, नीलेश जाधव यांनी केली.
इर्शेने पेटलेल्या टोळीने आयुषला निवडला
पुणे पोलिसांनी गायकवाड कुटूंबियावरील हल्ल्याचा डाव उधळून लावल्यानंतर आंदेकर टोळी इर्शेला पेटली. वनराजच्या हत्येला वर्षपुर्ती होउनही खूनाचा बदला पुर्ण झाला नव्हता. त्यामुळे टोळीने थेट घरातील नातवाला निवडले. त्याची दोन दिवस रेकी करीत टारगेट केले. अखेर ५ सप्टेंबरला रात्री पावणेआठच्या सुमारास गोळ्यांचा वर्षाव करीत आयुषचा खून केल. दरम्यान, आरोपी घरातील नातवालाच टारगेट करतील याची साधी भनकही पोलिसांना लागून दिली नाही.
सोशल मीडियावरील वॉच, कारवाईचा बडगा उगारणार
सोशल मीडियावर टोळीबद्दल व्हिडिओ किंवा रिल्स अपलोड करणार्यांवरही पोलीसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दहशत किंवा दादागिरी करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेणार्यांवर गुन्हे शाखेकडून बारकाईने वॉच ठेवला जात आहे. दरम्यान, जर कोणाला टोळीबद्दल काही तक्रार करायची असेल तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
तरूणावर गोळ्या झाडून खून करणार्या हल्लेखोरांसह कटात सहभागी असलेल्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित पसार आरोपींच्या शोधार्थ पथके कार्यरत असून, लवकरच त्यांनाही पकडण्यात येईल. खूनाचे नेमके कारण, आरोपींचा उद्देश, हत्यारे कोठून आणली याबाबत बारकाईने तपास केला जात आहे. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे























