सामुद्रिक शक्ती, आत्मनिर्भरता, ‘विकसित भारत २०४७’मध्ये नौदलाची निर्णायक भूमिका

भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी

marathinews24.com

पुणे – “विकसित भारत हा समुद्राच्या सामर्थ्यावर आधारित असणार आहे त्यामुळे भू-सुरक्षा, आर्थिक प्रगती आणि जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी सक्षम, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान-प्रधान भारतीय नौदल ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे ‘सागरी शक्ती आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून भारताचे भविष्य घडवणेबाबत- भारतीय नौदलाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित “जनरल बी. सी. जोशी स्मृतिव्याख्यान” प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख व अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते.

मचंर येथे ७३ वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क – सविस्तर बातमी

विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित केलेल्या या व्याख्यानात ॲडमिरल त्रिपाठी यांनी भारताचे भौगोलिक स्थान, ७ हजार ५०० किमी पेक्षा अधिक किनारपट्टी आणि भारतीय महासागर क्षेत्रातील सामरिक व आर्थिक महत्व अधोरेखित केले. “जगातील ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो. २०२७ पर्यंत भारताने पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असल्यास समुद्र आणि सागरी पायाभूत सुविधा हे विकासाचे मुख्य आधारस्तंभ ठरणार आहेत. जहाज बांधणी, जहाजमोडणी, ब्ल्यू इकॉनॉमी, सागरी तंत्रज्ञान, ऊर्जा मार्ग, बंदर विकास, सागरी सुरक्षा यामध्ये भारताकडे प्रचंड संधी आहेत आणि २०४७ पर्यंत भारताला जगातील अव्वल पाच जहाज बांधणी राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

ॲडमिरल त्रिपाठी यांनी भारतासमोरील “ग्रे झोन” आव्हानांवरही प्रकाश टाकला. सायबर हल्ले, दिशाभूल प्रचार, कायदेशीर छिद्रांचा गैरवापर, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट सिस्टीमवरील कारस्थान यांचा उल्लेख करीत त्यांनी सागरी सुरक्षेतील गुंतागुंतीची जाणीव करून दिली. भारतीय नौदलाच्या मानवतावादी आणि समुद्री सुरक्षा मोहिम चाचेगिरीविरोधी ऑपरेशन्स, संकटग्रस्त जहाजांसाठी तातडीची मदत, सागरी निरीक्षण यांचा विशेष उल्लेख केला. “नौदल हे केवळ संरक्षण दल नाही, तर भारताच्या जागतिक प्रभावाचे प्रतीक आहे.” युवा पिढीला प्रेरित करताना ते म्हणाले, “२०४७ मध्ये भारत ‘विक्सित भारत’ होणार की नाही, हे तुमच्या नवोन्मेष, संशोधन आणि नेतृत्वावर ठरणार आहे. प्रत्येक स्वदेशी जहाज, इंजिन आणि प्रणालीमुळे केवळ रोजगार निर्माण होत नाही तर देशाची सामरिक स्वायत्तताही वाढते.

ॲडमिरल त्रिपाठी म्हणाले की,“भारतीय नौदल राष्ट्राच्या सुरक्षेशीच नाही तर राष्ट्रनिर्माणाशी निगडित आहे. भारताचा उदय हा समुद्राइतकाच विशाल, स्थिर आणि अढळ असणार आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे दरवर्षी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. ‘गेटवे ऑफ नॉलेज’ गेटची स्थापना करणाऱ्या जनरल बी. सी. जोशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा वारसा आणि दूरदृष्टींचा सन्मान करण्यासाठी विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाने १९९५ मध्ये जनरल बी. सी. जोशी यांच्या नावे वार्षिक व्याख्यानमाला सुरू केली होती असे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख व अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे यांनी सांगितले.

कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाचा आढावा आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडला. तर भारताचा ९५% समुद्री व्यापार सुरक्षित ठेवण्यापासून ते स्वावलंबी सागरी उद्योगनिर्मितीपर्यंत भारतीय नौदलाची भूमिका किती निर्णायक आहे हे स्पष्टीकरणासह सांगितल्याबद्दल तसेच अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदर्शी अशा त्यांच्या अमूल्य विचारांनी विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि अकादमिक समुदाय यांना नवी दृष्टी दिल्याबद्दल प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी ॲडमिरल त्रिपाठी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या व्याख्यानाला हवाई दल, नौदल आणि लष्करातील अधिकारी उपस्थित होते. तसेच अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×