शेखापुरे टोळीच्या तिघांना बेड्या
marathinews24.com
पुणे – प्रतिस्पर्धी टोळीतील साथीदाराच्या खूनाचा कट गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी संयुक्त कारवाईत उधळून लावला आहे. खून करण्याच्या कटात सहभागी असलेल्या तिघा सराईत आरोपींना जेरबंद करण्यात आले. अवैध पिस्तुलासह कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन दिवसांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.या कारवाईमुळे मोठा गुन्हा टळला.’
टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना – सविस्तर बातमी
प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापुरे याच्याबाबत माहिती खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस अमलदार आजाद पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला सोमवारी पेठ येथून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी निखिल ज्ञानोबा लगाडे (वय २३, रा. गुलटेकडी) याच्याबाबतची माहिती युनिट पाचचे पोलीस अमलदार अकबर शेख व राहुल दमडेरे यांना मिळाली होती. तर तिसरा आरोपी अन्वर उर्फ जंबा शाकीर शेख (वय २३, रा. औद्योगीक वसाहत, गुलटेकडी) याच्याबाबत माहिती युनिट दोनचे पोलीस अमलदार शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्ज्वल मोकाशी, विनायक वाघमारे यांना प्राप्त झाली होती. माहितीनुसार, शेखापुरे टोळीने प्रतिस्पर्धी उमाप टोळीतील एका साथीदाराचा खून करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी अवैध पिस्तुले मिळवून तयारी सुरू केली होती. हालचालींची माहिती मिळताच संबंधित पथकांनी सापळा रचून १३ मार्चला काही आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले.
फरार मुख्य आरोपीचा शोध घेऊन २ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली. तसेच इतर आरोपींनाही त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी छापा टाकून पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक व शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजमाने, पोलीस निरीक्षक संदीप पवार, पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ही कारवाई यशस्वी केली.





















