मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप
marathinews24.com
पुणे – कृषी महाविद्यालय येथे 15 ते 17 मे 2026 या कालावधीत आयोजित ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026’ या स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते 15 मे रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे तर स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते 17 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
स्पर्धेसाठी उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला असून यावर्षी एकूण 1 हजार 290 अर्ज पोर्टलवर पुढील प्रॉब्लेम स्टेटमेंटमधील थीमकरीता प्राप्त झाले आहेत. यामध्ये मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने समावेश आहे.
राज्यनिहाय प्राप्त झालेल्या स्पर्धकांची संख्या पुणे प्रमाणे आहे; महाराष्ट्र 867, तामिळनाडू 231, तेलंगणा 28, कर्नाटक 23, उत्तर प्रदेश 22, राजस्थान व मध्य प्रदेश प्रत्येकी 18, गुजरात 17, पंजाब 16, दिल्ली 8, ओरिसा 7, अरुणाचल प्रदेश 6, केरळ 5, हरियाणा व आसाम प्रत्येकी 4, पश्चिम बंगाल, चंदीगड, बिहार व उत्तराखंड प्रत्येकी 2, गोवा, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व लडाख प्रत्येकी 1 या प्रमाणे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी ज्यूरी पॅनेलद्वारे करण्यात आली आहे. प्राथमिक छाननी मध्ये 120 नवकल्पना यांची निवड प्रत्यक्ष प्रदर्शनाकरिता करण्यात आली आहे. यामधून प्रत्येक प्रवर्गातून एक विजेता व उपविजेता यांची निवड ज्युरी पॅनेलमार्फत करण्यात येईल. विजेत्यास रुपये 25 लाख रुपये व उपविजेत्यास रुपये 15 लाख पारितोषिक देण्यात येणार आहे.
मागील वर्षी घेतलेल्या स्पर्धेचे परिणाम उत्साहवर्धक असून एकूण निवडलेल्या 16 पैकी 12 नवकल्पना, उत्पादने यांना कृषी विद्यापीठाकडून प्रमाणिकरण प्राप्त झाले आहे. यातील चार उत्पादनांची व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरू झाले असून उर्वरित विकसनाच्या प्रक्रियेत आहेत. तसेच यातील 4 उत्पादनांना शासनाच्या कृषी यांत्रीकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट करणेबाबत कार्यवाही सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना, उत्पादने यांना आकृष्ट करणे, सदर नव तंत्रज्ञांना योग्य व्यासपीठ व योग्य व्यवस्था निर्माण करणे या उद्देशाने या ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.
























