समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची माहिती
marathinews24.com
पुणे – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधील ७४१ गावांची केंद्र शासनाने निवड केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीमध्ये या गावांमध्ये विशेष ग्रामसभा व आदर्श गावांची संयुक्त पडताळणी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविली आहे.
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट – सविस्तर बातमी
या मोहिमेद्वारे ‘प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेची’ (पीएम- अजय) जनजागृती करावयाची असून, गावाच्या विकासात्मक गरजांची ओळख, गावांचे ग्राम विकास आराखडे तयार करणे, त्यास ग्रामसभेमध्ये मंजुरी देणे, ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे तयार केलेले आहेत, त्या आराखड्यांना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता देणे, आदी कामकाज करण्यात येणार आहे. त्याशिवाय गावांचे ७० किंवा त्यापेक्षा जास्त गुणांकन असलेल्या गावांना आदर्श ग्राम घोषित करणे, ‘आदर्श ग्राम’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांशी समन्वय साधण्यावर भर देण्याच्या अनुषंगाने उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या गावांमध्ये ५० सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे आणि १५ ग्रामीण पायाभूत सुविधांचे निकष परिपूर्णतेबाबत माहिती घेऊन त्याबाबत ग्रामसभेमध्ये सल्लामसलत करुन त्या गावासाठी आवश्यक असणाऱ्या विकास कामकाजासाठी १० लाख रुपयांच्या पुढील मागणी प्रस्तावित करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, आदर्श गावांची संयुक्त पडताळणी करुन तपासणी अहवाल ‘पीएम- अजय’ मोबाईल अॅपद्वारे व्हिलेज इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये भरावयाचा आहे.
याकामी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने या मोहिमेचे नियोजन केलेले आहे. या मोहिमेमध्ये, सर्व ग्रामस्थ, अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, बचत गट प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. विशेष ग्रामसभा मोहिम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.




















