२२ लाखांपैकी १२.३६ लाख विद्यार्थी पात्र; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थ्यांनी मिळवले यश
marathinews24.com
पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात “नीट’ या प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात राजस्थानमधील महेश केसवानी हा देशात पहिला आला आहे. इंदोर येथील उत्कर्ष अवधिया हा द्वितीय, तर महाराष्ट्रातील कृषांग जोशी हा तिसरा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या १० मध्ये फक्त १ मुलगी असून, दिल्लीची अविका अग्रवाल हिने मुलींमध्ये अव्वल तर देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) नीट परीक्षा देशभरात दि. ४ मे रोजी घेण्यात आली. या प्रवेश परीक्षेसाठी एकूण २२ लाख ७६ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ लाख ९ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एकूण १ लाख ८ हजार जागा उपलब्ध आहेत, त्यापैकी सुमारे ५६ हजार जागा सरकारी रुग्णालयांमध्ये आणि सुमारे ५२ हजार जागा खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत. नीट निकालांचा वापर दंतचिकित्सा, आयुर्वेद, युनानी या विषयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केला जातो.
महाराष्ट्रातून नीट परीक्षेसाठी २ लाख ४८ हजार २०२ नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षा दिली. त्यातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती ‘एनटीए’कडून देण्यात आली. देशात पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.