राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
marathinews24.com
पुणे – मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव कायद्यात सुधारणा तसेच पावसाळ्यात सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरड कोसळू नये याबाबत उपाय योजना करण्यासाठी जागतिक पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी व त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही करावी अशी विनंती राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जागतिक दर्जाचे ज्येष्ट पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्याशी मी नुकत्याच चर्चा केली. महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण कायद्यात काळानुसार बदल करणे व सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरडी कोसळणे यावर उपाय योजना करण्याबाबत या भेटीत मी त्यांच्याशी विशेष चर्चा केली. या चर्चेत वेगाने होणारे शहरीकरण, जंगलांचा होणारा ऱ्हास, शेती पद्धतीत होणारे बदल, वन्यजीवांच्या संख्येतील प्रादेशिक चढउतार यामुळे मानव आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे ते म्हणाले. अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.
रानडुक्कर, हत्ती, माकड यांसारखे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुळे आपण जंगली प्राण्यांना इजा पोहचवू शकत नाही. केरळने या कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्रातही अशा जंगली प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
मात्र या प्राण्यांना मारण्याची किंवा त्यांना इजा पोहचवण्याची परवानगी या कायद्यानुसार कोणालाही नाही. किंबहुना आपत्कालीन स्थितीत नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मारण्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. मानव आणि जंगली प्राणी दोघेही त्यांच्या अधिवासात सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. डॉ. गाडगीळ यांनी या समस्या सोडवण्यासाठी तज्ञांची समिति नेमणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ, गाडगीळ यांच्या व्यापक अभ्यासानुसार येत्या काही दिवसांत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची आणि त्यातून पर्यावरण व मनुष्य हानी होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी डॉ. गाडगीळ यांना संबंधित जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांनी भेटून उपाययोजना सुरू कराव्यात. सध्या हवामानातील बदल आणि पाऊस यामुळे याबाबत तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.