जेष्ठ महिलेची १ लाख ३२ हजारांची चैन चोरीला
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन जेष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांपासून चोरट्यांकडून प्रवाशी महिलांना लक्ष्य करीत लुटले जात आहे. मात्र, अजूनही चोरट्या टोळीचा पोलिसांना थांगपत्ताही लागला नसल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार लुटीच्या घटनांमुळे स्थानिक पोलिसांसह पीएमपीएल प्रशासनाकडून विशेष पथके तैनात केली जाणार की नाही, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
सराईत घरफोड्याला अटक, ८ गुन्ह्यांची उकल – सविस्तर बातमी
बसमधील गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रूपयांची सोन्याची चैन चोरून नेली आहे. ही घटना ११ ऑगस्टला बालाजीनगर ते एसटी कॉलनी पर्वती प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी बालाजीनगरात राहणार्या ७१ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बालाजीनगरात राहायला असून, ११ ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास बालाजीनगर ते एसटी कॉलनी पर्वती असा प्रवास करीत होती. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रूपयांची सोन्याची चैन हिसकावून नेली. प्रवास संपल्यानंतर बसमधून खाली उतरताना महिलेला गळ्यात चैन नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पर्वती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयातून नवविवाहितेची आत्महत्या पतीसह सासूला अटक
लग्नानंतर पतीसह सासूकडून नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत तिचा छळ सुरू करण्यात आला. तिला मारहाण करून टोचून बोलून मानसिक त्रासही दिला. त्यामुळे छळास कंटाळून नवविवाहिने आत्महत्या केली आहे. ही घटना ८ ऑगस्टला हवेली तालुक्यातील डोंगरगावात घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासूला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
राणी मुंजाजी घाडगे (वय १८ रा. डोंगरगाव, हवेली ) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती भागवत अंकुश कदम (वय २४) आणि सासू मुक्ता अंकुश कदम (वय ५४, दोघे रा. डोंगरगाव, हवेली ) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत आणि राणीचे २४ मे २०२५ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर पतीसह सासूने तिचा छळ सुरू केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेउन मानसिक त्रास दिला. त्यानंतर दोघांनी राणीला मारहाण करीत शिवागाळही केली. त्याच रागातून छळाला कंटाळून राणीने डोंगरगावात आत्महत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, लोणीकंद पोलिसांनी तातडीने पतीसह सासूला अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करीत आहेत.























