आरोप करणाऱ्या तीन तरुणींविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बेपत्ता विवाहित महिलेच्या शोधासाठी आलेल्या पोलिसांनी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन तरुणींविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच शासकीय कागदपत्रे फाडून टाकल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट, स्वप्नील वाघमारे, दत्ता शेंडगे, ॲड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश भलाणे ॲड. रेखा चौरे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
रेल्वे प्रवाशी महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी – सविस्तर बातमी
छत्रपती संभाजीनगरमधून विवाहित महिला बेपत्ता झाली होती. याबाबत तेथील पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. विवाहित महिला कोथरूड भागात वास्तव्यास असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर ४ ऑगस्टला काेथरूडमधील सदनिकेतून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले. तेथे राहणाऱ्या तीन तरुणांनी पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरद पवार) आमदार रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले होती. या तरुणींना शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती.
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी मारहाण, तसेच शिवीगाळ केल्याचे पुरावे आढळले नाहीत. मात्र, आंदोलकांनी शासकीय पत्र फाडून, जबरदस्तीने पोलीस आयुक्तालयात शिरून घोषणा दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण पुन्हा पेटणार
छत्रपती संभाजीनगरमधून घरगुती भांडणातून एक विवाहिता पुण्यात निघून आली होती. तिच्या तपासासाठी तेथून पोलिसांचे पथक विवाहितेचा सासरा असलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमवेत पुण्यात आले. त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मदतीने विवाहितेला मदत केलेल्या तीन तरुणींना ताब्यात घेतले. त्यानंतर तरुणींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. ३ ऑगस्ट २०२५ ला पोलीस आयुक्तालयात उग्र आंदोलन करण्यात आले. शिवीगाळ करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्याबाबतचे पुरावे पुढे न आल्याने पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. मात्र, पोलीस आयुक्तालयात जबरदस्तीने घुसून अरेरावी करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात आला. आंदोलनात काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेतेही सहभागी झाले होते. परिणामी, आता हे प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.






















